आता कोल्हापुरात पुन्हा लॉकडाऊन नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST2021-05-22T04:22:55+5:302021-05-22T04:22:55+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कामगार, मजूर, चहा गाडीवाले, छोटे व्यावसायिक, लोहार, नाभिक, आचारी, वेटर्स असे सगळे घटक देशोधडीला लागले आहेत ...

आता कोल्हापुरात पुन्हा लॉकडाऊन नको
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कामगार, मजूर, चहा गाडीवाले, छोटे व्यावसायिक, लोहार, नाभिक, आचारी, वेटर्स असे सगळे घटक देशोधडीला लागले आहेत तरी प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन करू नये, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा व शहर नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला पाठविले आहे.
उदरनिर्वाह चालवायचा की दवाखान्याचा खर्च, बँकेचे कर्जाचे हप्ते, लाईट व पाणी बिल अशा विवंचनेत कष्टकरी लोक सापडले आहेत. सरकारने फक्त रेशनकार्डवर गहू, तांदूळ दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली अशी भूमिका असता कामा नये. महागाई व बेरोजगारीने जगणं अवघड झालं आहे, त्यातच दवाखान्याच्या अवाढव्य खर्चाने लोक कंगाल झाले आहेत. शिक्षक, शासकीय कर्मचारी आरामात पगार घेत आहेत, त्यांना सर्व सोयी-सुविधा पगार मिळत आहेत. पण कष्टकऱ्यांचे हाल होत आहे. लाॅकडाऊन वाढवायचा असेल तर जनतेने भरलेल्या टॅक्समधून पगार घेणाऱ्या सर्व सरकारी कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षकांचा दहा दिवसाचा पगार कमी करून तो कष्टकरी लोकांना देण्यात यावा. प्रशासनाने कोवीड सेंटरची संख्या वाढवावी व लसीकरण मोहीम जलदगतीने राबवावी. भाजी मंडई दिवसआड चालू ठेवावी. शाळा, काॅलेज ही दोन भागांत सुरू कराव्यात, अशी मागणी अशोक पोवार, रमेश मोरे, दीपक घोडके, अजित सासने, प्रमोद पुंगावकर, अंजूम देसाई, चंद्रकांत पाटील, लहुजी शिंदे, महेश जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केली आहे.
--