‘स्मार्ट’ मानसिकतेची गरज...

By Admin | Updated: September 23, 2016 00:38 IST2016-09-23T00:11:22+5:302016-09-23T00:38:26+5:30

सतीशराज जगदाळे : ‘स्मार्ट सिटी’साठी कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची

Need 'smart' mentality ... | ‘स्मार्ट’ मानसिकतेची गरज...

‘स्मार्ट’ मानसिकतेची गरज...

केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ संकल्पना जाहीर केली आणि सर्वत्र या संकल्पनेचा बोलबाला सुरू झाला. मग या योजनेत आमचे शहर का बसले नाही म्हणून काथ्याकुटही सुरू झाला; परंतु नेमकी ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना काय आहे आणि कोल्हापूरच्या बाबतीत त्यासाठी काय करावे लागेल याबाबत ‘द इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस्’च्या कोल्हापूर चॅप्टरचे चेअरमन व कोल्हापुरातील प्रसिद्ध आर्किटेक्ट सतीशराज जगदाळे यांच्याशी साधलेला थेट संवाद.

प्रश्न : ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना नेमकी काय आहे?
उत्तर : चकचकीत रस्ते, पॉश इमारती म्हणजे स्मार्ट सिटी, अशी एक संकल्पना आपल्या डोळ्यांसमोर येते. हे दोन्ही घटक त्यात आहेतच, परंतु हे म्हणजे स्मार्ट सिटी नव्हे. ही संकल्पना खूपच व्यापक आहे. वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या सुलभ जगण्यासाठी जे-जे आवश्यक आहे अशांचा समावेश म्हणजे ‘स्मार्ट सिटी’ अशी ही ढोबळ संकल्पना आपल्याला सांगता येईल.
प्रश्न : यामध्ये नेमके कोणते घटक अंतर्भूत होतात?
उत्तर अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत बाबी आहेतच. आपापल्या कुवतीनुसार जो-तो त्यासाठी धडपडत असतो; परंतु निवाऱ्याची सोय चांगली असण्याची गरज आहे. पिण्यासाठी आणि खर्चासाठी मुबलक पाणी अत्यावश्यक आहे. प्रत्येक विभागाला सुसज्ज रुग्णालय, मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, नागरिकांसाठी बगीचा, संग्रहालये, सांस्कृतिक सभागृहे या बाबी आवश्यक आहे. हे बगीचे म्हणजे शहराची फुप्फुसे असतात. त्यामुळे तेथील देखभाल नीट होण्याची गरज आहे.
प्रश्न : ‘स्मार्ट सिटी’मध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग कितपत होऊ शकतो?
उत्तर : या संकल्पनेमध्ये तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होऊ शकतो. किंबहुना तंत्रज्ञानाशिवाय ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना प्रत्यक्षात येऊच शकत नाही. महापालिकेचे विविध कर भरण्यापासून ते वीज बिल, फोन बिल भरण्यापर्यंत आणि गॅस सिलिंडर बुक करण्यापासून ते किराणा माल मागविण्यापर्यंत अनेक बाबी आता मोबाईल आणि नेटच्या माध्यमातून सहज शक्य झाल्या आहेत. त्यासाठी व्यक्तीने बाहेर पडलेच पाहिजे असे नाही. आता अनेकजण घरात बसून लॅपटॉपवरच कामे करतात. प्रत्यक्षात आॅफिसला जाण्याची गरज आता कमी होत आहे.
प्रश्न : या संकल्पनेत नैसर्गिक बाबींचा कितपत फायदा होतो?
उत्तर : नैसर्गिक स्रोतांचा प्रभावी वापर हे ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेतील मुख्य वैशिष्ट्य आहे. सौर, पवन आणि जलऊर्जेचा शहराच्या विकासासाठी वापर करून घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. कोल्हापुरातही नवीन घरे बांधताना सौरऊर्जा उपकरणे बसविणे आवश्यक केले आहे. या तिन्ही घटकांच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करून विभागा-विभागांपुरती वापरता येईल का याचा अभ्यास होण्याची गरज आहे. मोठ-मोठ्या टाऊनशीपसाठी याच पद्धतीने ऊर्जानिर्मिती सुरू झाली आहे. त्यामुळे या नैसर्गिक बाबींचा पुरेपूर वापर करण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
प्रश्न : या पार्श्वभूमीवर कोल्हापूर कुठे आहे?
उत्तर : ‘स्मार्ट सिटी’पासून कोल्हापूर खूप लांब आहे, अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. आता कुठे आपल्याकडे शहराबाहेर मोठे रस्ते झालेत. अजूनही अंतर्गत रस्त्यांचा मोठा प्रश्न बाकी आहे. कमी रुंदीचे रस्ते रोज वाहतुकीच्या कोंडीला निमंत्रण देत आहेत. ‘स्मार्ट सिटी’मध्ये पुढच्या
आठ दहा वर्षांचा नव्हे, तर पुढच्या ५० वर्षांचा विचार करून नियोजन आवश्यक आहे. त्या दृष्टीने कोल्हापूरसाठी संबंधित संस्था, लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. लंडनसारख्या शहराशेजारी जशी नवी शहरे वसविण्यात आली आहेत त्या पद्धतीने नव्या कोल्हापूरचा विचार करायला हवा. जुन्या यंत्रणेवर मर्यादेपेक्षा ताण दिल्यास त्यातून काही स्मार्ट सेवा मिळणार नाहीत.
प्रश्न : त्यासाठी काय करण्याची गरज आहे?
उत्तर : हद्दवाढ हे त्यासाठीचा एक महत्त्वाचा उपाय आहे. कारण मर्यादित जागेत तुम्हाला गुणवत्तापूर्ण सेवा देताच येणार नाहीत. आता तो प्रश्न कसा सोडवायचा, ग्रामीण आणि शहरी समन्वय कसा साधायचा हे शासनाचे काम आहे; परंतु कोल्हापूरला ‘स्मार्ट सिटी’कडे पावलं टाकायची असतील तर हद्दवाढ गरजेची आहे.
प्रश्न : या बरोबरीने आणखी काही सुधारणा अपेक्षित आहेत का?
उत्तर : जुन्या शहरावरील ताण कमी करण्याचा पहिला भाग म्हणून महानगरपालिकेची इमारत हलविणे, शहरामध्ये ठिकठिकाणी मल्टिलेव्हल पार्किंगची सोय करणे यासारखी कामे प्राधान्याने हाती घ्यावी लागतील. कोल्हापूरची विमान सेवा सुरू करायला हवी. रेल्वे स्थानक हे केवळ मार्केट यार्डमध्ये नव्हे, तर नव्या कोकण व अन्य मार्गांचा विचार करून वळिवडे, गांधीनगर भागात नेण्याची गरज आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये
म्हणून सध्याचे स्टेशन ते नवे स्टेशन शटल सर्व्हिस सुरू करावी. तसेच सध्या शहर व्हीनस कॉर्नरपासून विभागले गेले आहे. ही शटल सेवा ओव्हर ब्रीजवरून करता आली तर शहरातील विभागलेपण जावून शहर एकजिनसी होईल.
प्रश्न : यामध्ये तुमची संस्था काय सहकार्य करू शकते?
उत्तर : आमच्या द इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस् या संस्थेचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे आम्ही कोल्हापूर विभागाच्यावतीने ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेसाठी काही संकल्पना मनाशी बाळगून आहोत. संबंधित यंत्रणांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, महिलांसाठी इलेक्ट्रॉनिक टॉयलेट बसविणे, शहरातील एखाद्या मुख्य आयर्लंडचे सुशोभीकरण करण्याची आमची तयारी आहे तसेच स्मार्ट सिटी संकल्पनेंतर्गत काही
डिझाईन्स आवश्यक असतील तर
तीही संघटनेच्यावतीने विनामूल्य
तयार करून देण्याची आमची
तयारी आहे. मात्र, हे सारे
करण्यासाठी मुळात पारंपरिक मानसिकता बदलून ती स्मार्ट बनविण्याची गरज आहे.
- समीर देशपांडे

Web Title: Need 'smart' mentality ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.