राष्ट्रवादी नगरपालिका स्वबळावर लढणार : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:25 IST2016-10-20T01:25:03+5:302016-10-20T01:25:03+5:30

निरीक्षकांच्याही नियुक्त्या : उमेदवारी मागणी अर्जांचे वाटप सुरू

NCP will fight on its own: Patil | राष्ट्रवादी नगरपालिका स्वबळावर लढणार : पाटील

राष्ट्रवादी नगरपालिका स्वबळावर लढणार : पाटील

कोल्हापूर : मित्रपक्ष सोबत आले तर ठीक; अन्यथा नऊ नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नगरपालिकेसाठी पक्षाच्या उमेदवारी मागणीच्या अर्जांचे वाटप सुरू झाले असून, बुधवारी एकाच दिवशी तब्बल ८०१ जणांनी अर्ज नेल्याचेही त्यांनी सांगितले.
नगरपालिकेच्या २०११ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पन्हाळा वगळता सर्व जागा लढविल्या होत्या. त्यापैकी १०९ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले होते. यावेळेला मित्रपक्ष सोबत राहावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. ते सोबत आले तर ठीक; अन्यथा स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी पक्षाने केल्याची माहिती ए. वाय. पाटील यांनी दिली.
कागल, मुरगूड, गडहिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा, पेठवडगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड या नगरपालिकांसाठी इच्छुक असणाऱ्यांना प्रदेश राष्ट्रवादीकडून आलेले विहित नमुन्यातील अर्ज आज, गुरुवारपासून रविवार (दि. २३)पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत. अर्ज भरून पक्ष कार्यालयाकडे पाठविण्याची मुदत २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत आहे. ही निवडणूक प्रक्रिया प्रदेश निरीक्षक दिलीप पाटील व जिल्हा निरीक्षक अनिलराव साळोखे यांच्या नियंत्रणाखाली राबविली जाणार असून, त्याशिवाय नगरपालिकानिहाय सहायक निरीक्षकांची नेमणूक केल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिलराव साळोखे उपस्थित होते.
विनय कोरेंसोबत आज चर्चा !
‘जनसुराज्य’ पक्ष हा आमचा पारंपरिक मित्रपक्ष आहे. ते या निवडणुकीत आमच्याबरोबर राहतील, असे वाटते. याबाबत आज आमदार हसन मुश्रीफ हे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

Web Title: NCP will fight on its own: Patil