‘पदवीधर’मध्ये मुश्रीफ यांच्या जोडण्या ठरल्या सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:58+5:302020-12-05T04:57:58+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी एकतर्फी विजयी मिळवून ...

‘पदवीधर’मध्ये मुश्रीफ यांच्या जोडण्या ठरल्या सरस
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी एकतर्फी विजयी मिळवून भाजपच्या बालेकिल्ल्याला जोरदार हादरा दिला. या मतदारसंघात लाड व भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात लढत नव्हतीच, खरी लढत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात राहिली. काेल्हापूर जिल्ह्यात लाड यांच्यासाठी मुश्रीफ यांनी लावलेल्या जोडण्या सरस ठरल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
पुणे पदवीधरसाठी सर्वाधिक ८९ हजार ५२९ मतदारांची नोंदणी कोल्हापूर जिल्ह्यात झाली होती. भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला, त्यांच्याकडूनच सर्वाधिक नोंदणी झाल्याने येथे भाजपचा उमेदवार मुसंडी मारेल, असेच वाटत होते. मात्र, महाविकास आघाडीने एकसंधपणे प्रचार यंत्रणा राबविली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी असली तरी त्यांच्यासह जिल्ह्यात आघाडीच्या आमदार, माजी आमदारांनी ‘पदवीधर’मध्येही लक्ष दिले होते. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. कोल्हापूर जिल्ह्यात अरुण लाड व संग्राम देशमुख असा सामना झालाच नाही, तर मंत्री मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांच्यातच लढाई पाहावयास मिळाली. भाजपचा पर्यायाने चंद्रकांत पाटील यांचा बालेकिल्ला ताब्यात घ्यायचाच या ईर्षेने मुश्रीफ यांनी जोडण्या लावल्या होत्या. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात २० हजार मतदार नोंदणी केली होती. ही सगळे मते लाड यांच्या मागे उभी केलीच, त्याचबरोबर इतर मतदारांकडून पहिल्या पसंतीचे मते घेण्यात ते यशस्वी ठरले. एकूणच लाड यांना मिळालेले मताधिक्य पाहता मंत्री मुश्रीफ यांनी लावलेल्या जोडण्याच सरस ठरल्या, हे निश्चित आहे.
मुश्रीफ यांच्याकडून शिवसैनिकांना स्फुरण
प्रत्येक मेळावा, बैठकांत भाजपचा उमेदवार विजयी झाला तर ती मंडळी आपल्या छाताडावर नाचतील, असे दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ते सातत्याने सांगत होते, तर भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष्य होत असल्याचे सांगत शिवसैनिकांना सतत चेतवत ठेवण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले.
देशमुख यांच्या पराभवाची कारणे -
‘पदवीधर’ मतदारसंघात भाजपकडून नवखा उमेदवार
भाजपच्या मतदार नोंदणीवरच संग्राम देशमुखांची भिस्त राहिली.
मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कमजोर पडलेले नेटवर्क
अरुण लाड यांच्या जमेच्या बाजू-
मागील निवडणुकीतील पराभवाची सहानुभूती
पराभूत होऊन कोल्हापूर जिल्ह्यात ठेवलेला संपर्क
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेने राबविलेली प्रचार यंत्रणा