रमेश पाटील कसबा बावडा: कोल्हापूर शहर आणि उपनगरात काल, गुरुवारी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जयंती नाल्यातून वाहून आलेला ५० टनहून अधिक कचरा राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात तटला आहे. साधारणता दोन एकराचे क्षेत्रफळ मावेल इतका हा कचरा नदीपात्रात पसरला होता. महापालिकेने जेसीबीच्या साह्याने हा कचरा हटवण्याचे काम तात्काळ सुरू केले असले तरी याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.गुरुवारी दुपारी शहर आणि परिसराला ढगफुटीसदृश्य पावसाने झोडपून काढले. गटारे भरून पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. या पाण्यातून मोठ्या प्रमाणात कचराही वाहून आला. कचरा जयंती नाल्याद्वारे पंचगंगा नदीतून वाहत राजाराम बंधारा येथे अडकला. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका यंत्रणेला जाग आली.एक जेसीबी, एक डंपर, तीन ट्रॅक्टर आणि काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सुमारे ५० टनाहून अधिक कचरा यावेळी नदीपात्रातून काढण्यात आला. यावेळी बंधार्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे नेहमी या मार्गावरून जाणाऱ्या लोकांची गैरसोय झाली.जबाबदार कोण ? या कचऱ्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा भरून टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे कागद, लाकडं आणि अन्य इतर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला. या कचऱ्याकडे बघितल्यानंतर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
Kolhapur: ५० टन कचरा पंचगंगेत वाहून आला, राजाराम बंधाऱ्याजवळ तटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:45 IST