पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने बैठक घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:09+5:302021-02-16T04:26:09+5:30
जयसिंगपूर : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ...

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने बैठक घ्या
जयसिंगपूर : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विकास खारगे यांच्याकडे मुंबई येथे त्यांची भेट घेऊन देण्यात आले. पाणी प्रदूषणाची परिस्थिती बिघडण्यापूर्वीच हा प्रश्न मार्गी लावावा, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानीने वेळोवेळी आंदोलने केली आहेत, मात्र प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. प्रदूषित पाण्यामुळे शेतीदेखील विषारी बनत आहे. नदीचे प्रदूषण वेळीच रोखले पाहिजे, अन्यथा येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याची गरज आहे.
इचलकरंजी, कोल्हापूर येथील उद्योजकांची कारखान्यात जाणाºया केमिकलयुक्त पाण्यावर सध्या होत असलेल्या प्रक्रियेपेक्षा अद्ययावत यंत्रणेद्वारे प्रक्रिया करून त्याच पाण्याचा पुनर्वापर करण्याची तयारी आहे. उद्योजकांना प्रकल्प उभारण्यासाठी वीज दरामध्ये सवलती देणे, केंद्र व राज्य सरकारकडून पर्यावरण खात्याकडून प्रकल्प अनुदान उपलब्ध करून देणे. सीईटीपी प्लँटसाठी जागा व शासनाकडून अनुदान, आदी गोष्टींना सवलती दिल्यास नदीचे प्रदूषण थांबले जाईल. यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घ्यावी. जेणेकरून प्रदूषण थांबविण्यासाठी ठोस उपाययोजाना करण्यासाठी योग्य निर्णय घेता येईल, असेही शेट्टी म्हणाले.
फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - मुंबई येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विकास खारगे यांना मागण्यांबाबतचे निवेदन दिले.