‘मातोश्री’वर होणार पंचनामा पक्षनेतृत्व गंभीर : स्थानिकांची एकमेकांवर चिखलफेक
By Admin | Updated: May 19, 2014 00:40 IST2014-05-19T00:37:49+5:302014-05-19T00:40:19+5:30
संतोष पाटील ल्ल कोल्हापूर कोल्हापुरात दगाफटका झाल्यानेच पराभव झाल्याची भावना शिवसेना नेतृत्वाची झाली आहे. ‘पराभव नेमका कशामुळे झाला’,

‘मातोश्री’वर होणार पंचनामा पक्षनेतृत्व गंभीर : स्थानिकांची एकमेकांवर चिखलफेक
संतोष पाटील ल्ल कोल्हापूर कोल्हापुरात दगाफटका झाल्यानेच पराभव झाल्याची भावना शिवसेना नेतृत्वाची झाली आहे. ‘पराभव नेमका कशामुळे झाला’, याबाबत महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निकालाच्या संध्याकाळपासूनच ‘मातोश्री’वरून विचारणा होऊ लागली आहे. आता पराभवाची चिकित्सा थेट ‘मातोश्री’वर होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक नेत्यांनी पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५साली विधानसभेवर भगवा फडकाविला. यानंतर कोल्हापूर भगवामय करण्याचे बाळासाहेबांनी जाहीररीत्या अनेकवेळा बोलून दाखविले होते. निव्वळ गाफीलपणामुळे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने दवडली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होता-होता राहिल्याने कोल्हापूरचा पराभव पक्षप्रमुखांच्या जिव्हारी लागला आहे. लोकसभा निकालादिवशी रत्नागिरी-सिंधुदुर्गनंतर उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूरच्या निकालाकडे लक्ष होते. ‘मातोश्री’वर सकाळपासून कोल्हापूरच्या निकालाचा आढावा घेतला जात होता. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे कोकणात विजयोत्सव साजरा करण्यासाठी जाण्यापूर्वी कोल्हापूरच्या पराभवाचे कारण जाणण्यास उत्सुक होते. थेट प्रा. मंडलिक यांच्याशी संपर्क करून पराभवाच्या कारणमीमांसेबाबत विचारणाही झाली. एकमेकाला संशयाच्या भोवर्यात उभे करीत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्यातील कमी झालेली दरी पुन्हा दुप्पट वेगाने दुरावत आहे. निवडणुकीपूर्वीची त्यांच्यातील एकी फक्त दिखावाच असल्याची आता शिवसैनिकांसह मतदारांत चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’वर होणारी चिकित्सा लोकसभा पराभवासंदर्भात असली तरी त्याचे पडसाद येणार्या काळात उमटणार आहेत. जिल्ह्यातील कुरघोडीमुळे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेतृत्व व मतदारांनी धक्कादायक निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.