कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच पोलीस यंत्रणा जिवाची बाजी लावून रस्त्यावर उतरून सक्षमपणे कार्यरत आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून कडक लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण काही घटकांकडून अद्याप लॉकडाऊन गांभीर्याने घेतला जात नाही, त्यांच्यावर कायद्याचा बडगा आणून त्यांनाही सरळ करणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केले आहे. त्यासाठी तीन सत्रात पोलीस प्रामाणिकपणे बंदोबस्तात रस्त्यावर राहून कर्तव्य बजावत असल्याने अधीक्षक बलकवडे यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाला हरवण्यासाठी कडक लॉकडाऊनला नागरिकांचाही प्रतिसाद चांगला लाभत आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. घरातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे निर्बंध असताना अद्याप मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉकच्या नावाखाली तसेच कुत्री घेऊन मिरवण्यासाठी रस्त्यावर फिरणाऱ्या घटकाने लॉकडाऊन अद्याप मनावर घेतल्याचे दिसत नाही. अशांवर कारवाईचे सत्र सुरू असले तरीही, त्यांच्यावर येथून पुढे आणखी तीव्र कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आता रात्री कठड्यावरील गप्पा नाहीत रंगणार
रात्रीच्यावेळी जेवल्यानंतर काही चौका-चौकात कठड्यावर गप्पा मारत बसणाऱ्यांनाही कायद्याचा बडगा दाखवून त्यांच्याही कृतीला चाप लावणार आहे.
दरम्यान, काही अल्पवयीन मुलांकडून अथवा सक्षम व्यक्तींकडूनही बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांची जाणून-बुजून चेष्टा-मस्करी करून त्यांना त्रास दिला जात आहे. अशांच्या कारवायांनाही लगाम घालण्याची वेळ आली आहे. अशा चेष्टा-मस्करी करणाऱ्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यावर गुन्हे नोंदवणार असल्याचेही अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.