- सचिन जवळकोटे (कार्यकारी संपादक, कोल्हापूर)
Kolhapur Politics: शिवघराण्याच्या दोन राजधान्या. कोल्हापूर. सातारा. दोन्हीकडचे वंशज राज्याच्या राजकारणात स्वत:चं वेगळं अस्तित्व दाखविण्यात यशस्वी ठरलेले. राजघराण्याच्या सामाजिक वलयाचा फायदा घेण्यासाठी सारेच पक्ष आतूर, मात्र महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी वेळोवेळी यांच्या हातातून सुटलेली. आता तर दोन खासदारकी अन् एक कॅबिनेट मंत्रिपद या ‘रॉयल फॅमिली’कडं, तरीही कुठल्याच वादात न पडण्याची घेतली जात असलेली खबरदारी विस्मयजनक. आश्चर्यकारक. कदाचित असू शकतो हा शिवकालीन गनिमी कावा. त्याचाच हा शोध. लगाव बत्ती...
गेल्या आठवड्यात कोल्हापुरात ‘ठाकरेसेने’त दोन गट आमने-सामने आलेले. मात्र, या वैयक्तिक घमासानीत ‘पवारां’च्या ‘संजय’नी थेट ‘छत्रपती’ घराण्यावरच आरोप केलेला. गेल्या वर्षीच्या ‘आमदारकी’वेळी केवळ महायुतीला फायदा करून देण्यासाठी ‘मधुरिमाराजें’नी माघार घेतली, असा सनसनाटी दावा केलेला. तरीही हे घराणं अत्यंत निर्विकार. शांत. तटस्थ. नाही म्हणायला ‘मालोजीराजें’नी फक्त ‘लोकमत’शी बोलताना भावना व्यक्त केलेल्या, ‘आता मी काहीच प्रतिक्रिया देणार नाही. वेळ आल्यानंतर बोलेन!’ त्यानंतर दोनच दिवसांनी ‘शिंदेसेने’च्या ‘शारंगधर’ पोस्टरवर याच ‘राजें’चा फोटो झळकलेला. तेव्हाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं, ‘मी कुठल्याच सेनेत जाणार नाही.’ त्यांच्या या दोन्ही थंडगार रिॲक्शनमुळे कोल्हापूरकर गोंधळात पडलेले. ‘शाही कुटुंबा’ची आगामी राजकीय भूमिका काय, यावर चौका-चौकांत कट्ट्यावर पैजा झडू लागलेल्या.
खरंतर ‘मोठे महाराज’ सध्या इथले खासदार. ‘संभाजीराजे’ माजी खासदार. ‘मालोजीराजें’नीही २००९ साली आमदारकी लढवण्याचा कटू अनुभव घेतलेला. तिघांनाही राजकारण तसं नवं नसलेलं. ‘पिता-पुत्रां’ची राजकीय विचारधारा कधी कधी सार्वजनिक ठिकाणी वेगळी असल्याचं जनतेला वाटलं असलं तरीही, ‘फॅमिली’ पातळीवर सारे एकच. एकीकडं ‘थोरले काका बारामतीकरां’चे ‘मोठ्या महाराजां’शी वैचारिक ऋणानुबंध खूप दृढ. दुसरीकडं ‘फडणवीसां’सोबत ‘संभाजीराजें’ची मैत्रीही घनिष्ठ. ‘गडकरी’ही ‘न्यू पॅलेस’वर हक्कानं नाष्ट्याला येऊन गेलेले.
चार वर्षांपूर्वी ‘संभाजीराजें’नी ‘ठाकरें’ची ‘खासदारकी’ नाकारून नेमकं काय मिळवलं, याचा शोध आजही त्यांचे कार्यकर्तेही घेत असलेले, मात्र, अवघ्या महाराष्ट्रात त्यांच्या भाषणांना मिळणारा प्रतिसाद अत्यंत लक्षणीय. जबरदस्त. कैक दशकांचे पक्ष एका रात्रीत तडाऽऽतड फुटत असताना ‘स्वराज्य पक्ष’ मात्र विदर्भ-मराठवाड्यातील रयतेला भावलेला. ▪️‘विशाळगडा’बाबतची त्यांची रोखठोक भूमिका कोल्हापूरच्या पुरोगामी विचारसरणीला दचकायला लावणारी ठरली असली तरीही काही तरुणांना आवडलेली. ‘रायगडा’वरचा ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ म्हणजे अद्भुत अन् अद्वितीय अशी परंपराच बनलेली. ‘मालोजीराजें’नीही केवळ ‘एज्युकेशन ॲक्टिव्हिटी’मध्येच स्वत:ला गुंतवून घेतलेलं. एवढं सारं कर्तृत्व असतानाही सध्याच्या सक्रिय राजकारणापासून दूरच राहिलेले. लगाव बत्ती..
फॉर्म भरल्यानंतरचा झंझावात..
भलेही गेल्यावर्षी ‘मधुरिमाराजें’नी माघार घेतली असली तरीही फॉर्म भरल्यानंतर अवघ्या चार-पाच दिवसांत त्यांनी गाठीभेटींचा जो झंझावात निर्माण केला होता, तो भल्या-भल्यांना अचंबित करणारा ठरलेला. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कोल्हापूरकरांना स्पष्टपणे दिसून आलेली. किमान भविष्यात तरी आलेली संधी त्या सोडणार नाहीत, यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास. कारण ‘खानविलकर फॅमिली’च्या नसानसातच म्हणे राजकारण असलेलं. लगाव बत्ती..
लगतच्या ‘साताऱ्या’त तर दोन ‘राजे’. दोघेही आक्रमक. इकडं जाळ.. तिकडं धूर. एकमेकांना नामोहरम करण्यातच दोघांनी आपल्या आयुष्यातली महत्त्वाची कैक वर्षे विनाकारण घालवलेली. मात्र, यातून केवळ विरोधकांचाच फायदा होत गेला, हे लक्षात आल्यानंतर एकत्र आलेले. ‘उदयनराजे’ हे चारवेळा लोकसभेवर तर एकदा राज्यसभेवर गेलेले. ‘दक्षिण महाराष्ट्रा’तले ‘कमळ’वाल्यांचे पहिले आमदार.. अन् महसूल राज्यमंत्रीही. राजमाता ‘कल्पनाराजे’ यांनीही शिवसेनेकडून ‘आमदारकी’ लढविलेली. सलग दहा वर्षे ‘घड्याळा’चे खासदार राहूनही याच ‘सातारा’ जिल्ह्यात ‘थोरले काका बारामतीकरां’चा बालेकिल्ला समूळ नष्ट करण्यात ‘उदयनराजे’ यशस्वी ठरलेले. एक काळ असा होता की, इथल्या खासदारक्या, आमदारक्या, झेडपी, पंचायत, पालिका अन् डीसीसीसह साऱ्याच संस्था ‘बारामतीकरां’च्या इशाऱ्यावर नाचलेल्या. मात्र, गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच ‘थोरल्या काकां’चा एकही लोकप्रतिनिधी इथं अस्तित्वात नसलेला. लगाव बत्ती..
‘उदयनराजे’ तसे बोलायला फटकळ. मात्र, कार्यकर्त्यांना जीव लावणारे. त्यांचा चाहता वर्ग महाराष्ट्राच्या बाहेरही. तरुण वर्गात प्रचंड क्रेझ. त्यांनी स्वत:चा नवीन पक्ष काढावा म्हणून त्यांच्या ‘मावळ्यां’चा वेळोवेळी दबाव; मात्र, आजपावेतो तेही स्वत:च्या मतदारसंघापुरतंच सीमित झालेले. नाही म्हणायला ‘रायगडा’वरील ‘वाघ्या’ प्रकरणात त्यांची कैकवेळा ‘संभाजीराजें’शी मोबाइलवर गुप्त चर्चाही झालेली. या वादग्रस्त मुद्द्यावर दोघांचीही भूमिका ठाम राहिलेली. ‘रायगडा’मुळं जशी ‘संभाजीराजें’ची प्रतिमा अधिक उजळलेली, तशीच ‘उदयनराजें’चा प्रतापगडावरचा शाही सोहळाही दरवर्षी डोळे दिपवून टाकणारा ठरलेला. त्यांच्या जन्मदिनी ‘फडणवीसां’पासून ‘एकनाथभाईं’पर्यंत मंत्रिमंडळाचा मोठा गोतावळा ‘जलमंदिर’वर बुके घेऊन आलेला. मात्र, तरीही ‘सेंट्रल मिनिस्ट्री’च्या ‘शपथविधीचा मुहूर्त’ प्रत्येकवेळी लांबणीवरच पडलेला. लगाव बत्ती..
सध्या सातारा जिल्ह्यात लाल दिव्याच्या चार गाड्या, तरीही सातारा शहराचं राजकारण फिरतं एकाच मंत्र्याभोवती. ‘बाबाराजे’ अर्थात ‘शिवेंद्रसिंहराजे’. सतत जनतेत मिसळण्याची सवय. कामाचा प्रचंड उरक. समस्यांची अचूक जाण. निधी खेचून आणण्याचा मोठा आवाका. तरीही सातारा-जावळीच्या फायलींवर सर्वप्रथम सही भासू लागली ‘शंभूराज’ यांचीच. सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असतानाही ‘लातूर’ला ये-जा करण्यातच राजकीय दमछाक होऊ लागलेली. ते एक ना एक दिवस इथले ‘पालकमंत्री’ होतील, या भाबड्या आशेवर त्यांचे कार्यकर्ते पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत. मात्र, साताऱ्याच्या फटाक्यांचा आवाज थोडाच ‘एकनाथभाईं’च्या ‘तापोळ्या’त ऐकू जाणार? लगाव बत्ती..
रयतेला नेमकं काय हवं हे परफेक्ट ओळखलेल्या ‘बाबाराजें’नी अलीकडं आपला लूकही पूर्णपणे बदललेला. जुन्या काळातील राजांप्रमाणे केस मानेवर वळवलेले. काळ्या-पांढऱ्या दाढीत टोकदार मिशा रुळवलेल्या. त्यांच्या यशस्वी राजकारणात एका व्यक्तीचा खूप मोठा अदृश्य वाटा राहिलेला. तो म्हणजे ‘वेदांतिकाराजे’ यांचा. खरंतर ‘खर्डेकर फॅमिली’ची मोठी परंपरा लाभलेल्या ‘वेदांतिकाराजें’ची राजकीय महत्त्वाकांक्षाही प्रचंड; मात्र, ‘नगराध्यक्ष’ निवडणुकीत ‘भाऊबंदकी’ उफाळून आलेली. एका राजघराण्यानं दुसऱ्या राजघराण्याचा पराभव करून काय मिळवलं, हे अद्यापपावेतो सर्वसामान्य सातारकरांना कधीच न उमजलेलं. सध्या त्यांनी केवळ ‘सामाजिक-शैक्षणिक’ कार्यात स्वत:ला गुंतवून घेतलेलं. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा सक्रिय व्हावं, ही त्यांच्या कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा. परवा एका कार्यक्रमात ‘पुरुषोत्तम शेठ’ या ज्येष्ठ सातारकरांनी ‘वहिनींनी पुन्हा नगराध्यक्ष व्हावं’, अशी इच्छा व्यक्त केलेली, तेव्हा त्यांनी केवळ हसून विषय संपवलेला. मात्र, राजघराण्यांसाठी राजकारणाचा विषय कधीच संपत नसतो, हे खूप कमी लोकांना ठाऊक असलेलं. लगाव बत्ती..