नोकरी मिळत नसल्याने ‘डीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:31+5:302021-09-11T04:24:31+5:30
डीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळते, असा गेल्या वीस वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा समज होता आणि तो खराही ठरायचा. मात्र, ...

नोकरी मिळत नसल्याने ‘डीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ!
डीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळते, असा गेल्या वीस वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा समज होता आणि तो खराही ठरायचा. मात्र, शिक्षक भरतीबाबत राज्य शासनाकडून ठोसपणे कार्यवाही झाली नसल्याने गेल्या दहा वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होऊ लागला. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून आणि भरतीसाठी आवश्यक असणारी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे.
पॉईंटर
जिल्ह्यातील डीएड कॉलेज : १९
एकूण जागा : १०७७
यंदा आलेले प्रवेश अर्ज : ४५०
नोकरीची हमी नाही!
प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे. मात्र, त्यांच्या भरतीबाबत राज्य सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल पडत नसल्याचे वास्तव आहे. या भरतीला पात्र होण्यासाठी बंधनकारक असणाऱ्या टीईटी परीक्षेची काठीण्य पातळी अधिक असल्याने त्यातील उत्तीर्णतेचे प्रमाण कमी आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही पुढे नोकरी मिळेलच याची हमी नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
म्हणून इतर अभ्यासक्रमांना घेतला प्रवेश
बारावीनंतर दोन वर्ष शिक्षण घेऊन आणि टीईटीसारखी कठीण परीक्षा देऊनही नोकरी मिळेलच याची हमी नाही. त्यामुळे डीएडऐवजी तंत्रनिकेतनला प्रवेश घेतला आहे.
-तेजस पोवार.
संवादकौशल्य वाढविण्यासह स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी डीएड अभ्यासक्रम उपयुक्त ठरणारा आहे. पण, कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता व्यावसायिक अभ्यासक्रम महत्त्वाचे वाटत आहेत. पर्यटनक्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे.
-दर्शन खोत.
प्राचार्य म्हणतात
शिक्षक भरतीची होत नसल्याचा परिणाम डीएड अभ्यासक्रमाला प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे. विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. हा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षांचा पाया आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा.
-डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी डीएड अभ्यासक्रम उपयुक्त ठरणारा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक विद्यार्थी हे शासनातील ग्रामसेवक, पीएसआय, तलाठी, मंत्रालयीन सहाय्यक, आदी पदांवर काम करत आहेत. शिक्षक भरतीची गती वाढावी. डीएड केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य मिळावे.
-संजय शेटे, प्राचार्य, प्रताप ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, निगवे.
100921\10kol_1_10092021_5.jpg
डमी (१००९२०२१-कोल-डमी ११६०)