कोल्हापूर : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्याकडे हद्दवाढ करावी, असा आग्रह धरण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांची वेळ घेण्यात येईल, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झाल्याचे खासदार शाहू छत्रपती व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितले.कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या प्रश्नात खासदार शाहू छत्रपती यांनी लक्ष घातले असून, त्यांच्याच पुढाकाराने सोमवारी सायंकाळी न्यू पॅलेस येथील त्यांच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव उपस्थित होते. माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील दूरभाष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. बैठकीस आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके उपस्थित राहू शकले नाहीत.बैठकीनंतर खासदार शाहू छत्रपती यांनी पत्रकारांना माहिती दिली. शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झाले. आज जे उपस्थित होते आणि जे अनुपस्थित होते अशा सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून हद्दवाढीचा प्रश्न सोडवायचा आहे. त्याकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली जावी. त्या बैठकीत हद्दवाढीचा आग्रह धरून निर्णय घ्यायला भाग पाडू या, असे ठरले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सर्वसमावेशक व्हावी, लवकरात लवकर व्हावी यासाठी पालकमंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ प्रयत्न करणार आहेत. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे, असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच हा प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोल्हापूरचा विकास हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेवून मागणी केली जात आहे. आता सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असेही शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले.
हद्दवाढीबाबत सर्वांचे एकमत - मुश्रीफकोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे याबाबत आमचे सर्वांचे एकमत झाले आहे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तसा आम्ही आग्रह धरू, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार : आबिटकरखासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा इतिवृत्तांत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालू. त्यांच्याकडून बैठकीची वेळही मागून घेऊ. मला वाटते जास्तीत जास्त आठ दिवसांत ही बैठक होईल, असे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
हद्दवाढीवर कुणाचे एकमत झाले यापेक्षा मी ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो त्यांचे मत काय आहे, हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील लोकांचे जे मत आहे तीच माझी भूमिका आहे. - चंद्रदीप नरके, आमदार करवीर
कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांचा फोन बंद होता.