क्षीरसागर, चंद्रकांतदादा, नरके हेच ‘घरभेदी’
By Admin | Updated: May 21, 2014 17:39 IST2014-05-21T01:10:29+5:302014-05-21T17:39:16+5:30
शिवसेनेच्या चिंतन बैठकीत आरोप : शहरप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी; ‘सूर्याजी पिसाळ’ शोधा : संजय पवार; भाजपचे अजिबात सहकार्य नाही

क्षीरसागर, चंद्रकांतदादा, नरके हेच ‘घरभेदी’
कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील सभा कोणी होऊ दिली नाही, शहरातील ४० टक्के केंद्रांवर पोलींग एजंट का नव्हते, करवीरमध्ये कोणी साटेलोटे केले, अशी विचारणा करत आमदार चंद्रकांतदादा पाटील, राजेश क्षीरसागर व चंद्रदीप नरके हेच खरे घरभेदी असल्याच्या तोफा मंगळवारी शिवसैनिकांनी डागल्या. आपल्या गुणाचे खापर जिल्ह्यावर फोडणार्यांचे शहरप्रमुखपदाचा राजीनामा द्यावा, अशी संतप्त मागणी कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या चिंतन बैठकीत केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत अजिबात सहकार्य केले नसल्याची जोरदार टीका या बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कोल्हापूर मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्यांची चिंंतन बैठक आज, मंगळवार येथील शाहू स्मारकमध्ये झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संजय पवार होते. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी थेट आमदार क्षीरसागर यांच्यावर हल्ला चढविला. स्वार्थी राजकारण करणार्यांनी २४ वर्षे निष्ठेने काम करणार्यांना निष्ठा शिकवू नये. बहुतांशी प्रभागात पोलींग एजंट का ठेवले नाहीत, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला फसवले, ते नेस्तनाबूत झालेत, हे विसरू नका. करवीरमधीलही मताधिक्याबाबत तपासणी होणे गरजेचे आहे. शिवसेनेची शहर व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून लोकसभा निवडणुकीतील गद्दार शोधून काढा, अशी मागणी पक्षप्रमुखांकडे करणार असून, कार्यकर्त्यांनी हतबल न होता पुन्हा ताकदीने कामाला लागावे, असेही पवार यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, रक्ताचे पाणी करून गडहिंग्लज विभागात काम केल्याने १९ हजारांचे मताधिक्य मिळाले, टीका करणार्यांनी पहिल्यांदा जिल्ह्यात फिरावे. चांगले काम करणार्यांना कधीतरी चांगले म्हणा. बैठकीच्या सुरुवातीलाच कमलाकर जगदाळे यांनी तोफ डागली. ते म्हणाले, संजय मंडलिक यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असताना, काही मंडळींनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दोष देण्यास सुरुवात केली. ज्यांना पदे दिली, अशा मंडळींनीच गद्दारी केली, असे गद्दार, नासकी माणसे शिवसेनेत आहेत, तोपर्यंत कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा होणे शक्य नाही. नगरसेवक संभाजी जाधव म्हणाले, शहरप्रमुख म्हणून आमदार क्षीरसागर यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, बहुतांशी केंद्रावर पोलींग एजंट नव्हते, असे का? नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील सभा कोणी होऊ दिली नाही, याचा पंचनामा झालाच पाहिजे. पंचायत समिती सदस्य तानाजी आंग्रे यांनी आक्रमक शैलीत क्षीरसागर व नरके यांच्यावर हल्लाबोल केला. करवीरमध्ये निष्ठावंत शिवसैनिकाला किंमत नाही, स्वत:च्या संसारावर तुळशीपत्र ठेवून गेली वीस वर्षे काम करत आहे. ‘गोकुळ’मधील ढपल्यासाठी ज्यांनी तत्कालीन मंत्री नारायण राणे यांचे पाय धरून हा भगवा कधीही खांद्यावरून खाली ठेवणार नाही, म्हणणार्यांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. कोणी कोणाला मदत केली, हे एका व्यासपीठावर येऊन तपासावे. पक्षनेतृत्वाला कोणी फसवत असेल तर आगामी काळात त्यांना चकमा दिल्याशिवाय राहणार नाही. हर्षल सुर्वेे म्हणाले, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. आपणच पायात पाय अडकून तोंडावर पडलो आहोत, याचे आत्मचिंतन करा. सत्तेसाठी कार्यकर्त्यांचे मुडदे पाडलेले नेते एकत्र येऊ शकतात मग शिवसेनेतील नेत्यांमध्ये ‘मीपणा’ कशासाठी, निवडणुकीत कोण सूर्याजी पिसाळ झाला, त्याचा शोध घेऊन हकालपट्टी करावी. (प्रतिनिधी)