ऊस उत्पादनात ‘कोल्हापूर’ राहणार राज्यात भारी

By Admin | Updated: January 22, 2017 23:59 IST2017-01-22T23:59:19+5:302017-01-22T23:59:19+5:30

१ कोटी १७ लाख टन गाळप : पुणे विभाग मागे पडणार

Kolhapur will remain in the state of sugarcane production | ऊस उत्पादनात ‘कोल्हापूर’ राहणार राज्यात भारी

ऊस उत्पादनात ‘कोल्हापूर’ राहणार राज्यात भारी



कोल्हापूर : राज्यात यंदा उसाची टंचाई असल्याने बहुतांश कारखान्यांना आपले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार नाही. आतापर्यंत झालेल्या गाळपात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहिला आहे. दरवर्षी पुणे विभाग पुढे असायचा; पण सोलापूर जिल्ह्यातील कारखाने उसाअभावी बंद राहिल्याने त्याचा फटका या विभागास बसला आहे. कोल्हापूर विभागाचे आतापर्यंत १ कोटी १७ लाख टन गाळप झाले असून, गाळपाबरोबर उताऱ्यातही विभाग राज्यात भारी ठरणार आहे.
गतवर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळाचा फटका यंदाच्या उसाच्या हंगामावर दिसत आहे. दुष्काळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. अडीच महिने पूर्ण होण्याअगोदरच निम्म्याहून अधिक कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागात पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
या तिन्ही जिल्ह्यांत उसाचे उत्पादन व कारखान्यांची संख्या अधिक असल्याने पुणे विभाग राज्यात गाळपात आघाडीवर असतो; पण यंदा सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा मोठा फटका बसल्याने सुरुवातीपासूनच विभागातील कारखाने अडखळत सुरू झाले. गेल्या हंगामात सुमारे २ कोटी ३१ लाख टनांचे गाळप झाले होेते. यंदा आतापर्यंत १ कोटी १६ लाखांचे गाळप झाले आणि ५२ पैकी तब्बल २७ कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागात ४० कारखाने आहेत. त्यांतील चार कारखाने बंद झाले असून आतापर्यंत १ कोटी १७ लाख टनांचे गाळप झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’, व ‘दत्त-शिरोळ’ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अजून ऊस आहे. त्यामुळे हे कारखाने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहेत. उर्वरित कारखाने आणखी महिनाभर म्हणजेच फेबु्रवारीअखेर चालतील, असा साखर विभागाचा अंदाज आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागात २ कोटी २७ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा तेवढे होणार नसले तरी किमान ते १ कोटी ६० लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा राज्यात ऊस गाळपात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहणार, हे निश्चित आहे.
गेल्या हंगामात राज्यात ४ कोटी ३९ लाख टनांचे गाळप झाले होते. यंदा आतापर्यंत ३ कोटी ७ लाखांपर्यंतच हंगाम आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा किमान ८० लाख टनांनी गाळप कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
विभागनिहाय झालेले गाळप
विभागकारखानेगाळपसाखर उत्पादनउताराहंगाम बंद
संख्याटनांतक्विंटलटक्के कारखान्यांची संख्या
कोल्हापूर४०१ कोटी १७ लाख१ कोटी ३९ लाख११.८८४
पुणे५२१ कोटी १६ लाख१ कोटी २५ लाख१०.७३२७
अहमदनगर२३३७ लाख ३ हजार३५ लाख ६५ हजार९.६३१४
औरंगाबाद १७१८ लाख २८ हजार८ लाख ८७ हजार८.८७१३
नांदेड१११० लाख २५ हजार९ लाख ८२ हजार९.८२८
अमरावती३२ लाख ४३ हजार२ लाख ३७ हजार९.७२३
नागपूर४३ लाख १३ हजार३ लाख ६ हजार९.७९-
एकूण१७५३ कोटी ७ लाख ३ कोटी ३४ लाख १०.८६ ६९
८८ हजार४३ हजार

Web Title: Kolhapur will remain in the state of sugarcane production