कसबा बावडा (जि. कोल्हापूर) : विठ्ठलामुळेच माझा पुनर्जन्म झाला आहे, त्यामुळे संक्रांत झाल्यानंतर आणि गोळ्यांचा कोर्स संपल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी जाणार असल्याचे पांडुरंग रामा उलपे ऊर्फ पांडू तात्या यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी पांडू तात्या नेहमीप्रमाणे घरी देवाची पूजा करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पत्नी बाळाबाई यांना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांना हाका मारल्या. लगेचच त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले.
त्यानंतर काही वेळातच कसबा बावडा उलपे मळ्यातील त्यांच्या नातेवाइकांना ही बातमी समजली. त्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू झाली. दरम्यानच्या काळात तात्यांना ॲम्ब्युलन्समधून घरी आणताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यांमुळे त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे घरी येणारी ॲम्ब्युलन्स तशीच परतावून दवाखान्यात नेली. दवाखान्यात पुन्हा उपचार सुरू झाले. तात्या उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
४४ वर्षे वारकरी‘मी विठ्ठलाचा भक्त आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर मंदिरात न चुकता दररोज दर्शनासाठी जातो. पंढरीची वारी कधीही चुकली नाही’, असे पांडू तात्या सांगत होते.पांडू तात्या शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना एक मुलगी आहे. १९८० सालापासून ते वारकरी संप्रदायात आहेत. सर्वांशी मिळून मिसळून वागत. तात्यांना भेटावयास त्यांच्या घरी रीघ लागली आहे.