आचारसंहितेपूर्वी कोल्हापूर ‘टोलमुक्त’
By Admin | Updated: August 10, 2015 01:15 IST2015-08-10T01:15:48+5:302015-08-10T01:15:48+5:30
चंद्रकांतदादा पाटील : कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या बैठक

आचारसंहितेपूर्वी कोल्हापूर ‘टोलमुक्त’
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राज्य टोलमुक्तीचे दिलेले आश्वासन ९० टक्के पूर्ण केले आहे. कोल्हापुरातदेखील टोलमुक्तीच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. याबाबतचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहीर होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री पाटील म्हणाले,
‘एमएच ०९’ वगळून कोल्हापूर जिल्हा टोलमुक्त झाला असता; परंतु टोलविरोधी कृती समितीचा आग्रह आडवा
आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण टोलमुक्तीसाठी सकारात्मकता दाखविली. त्यानुसार त्याची
प्रक्रिया सुरू केली. मूल्यांकन पूर्ण करून टोलविरोधी कृती समितीचे मत लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. आपण म्हणतो, ‘आयआरबी’ला व्याजासहित ३०० कोटी द्यावे लागतात. याउलट ‘आयआरबी’
म्हणते व्याजासहित ८०० कोटी रुपये द्यावे लागतात.
याबाबत सरकार आणि ‘आयआरबी’ यांच्यात चर्चा होऊन पाया निश्चित केला जाईल. त्या दृष्टीने बैठका सुरू होतील. यातून अंतिम निर्णयासाठी थोडा वेळ लागणार आहे. या दृष्टीने मोडस आॅपरेटिंग करण्याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या, मंगळवारी बैठक होईल. यासाठी टोलविरोधी कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित असतील. ३० सप्टेंबरला आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी टोलमुक्तीचा निर्णय होईल, अशी मला खात्री आहे. हा निर्णय टोल कायमचा बंद होईल, असाच असेल. (प्रतिनिधी)
ठोस निर्णय हवा... अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवू
सरकारनेच नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीच्या उपसमितीने २३९ कोटी ६४ लाख रुपयांचे वास्तववादी मूल्यांकन करून तो अहवाल सादर केल्यामुळे ‘आयआरबी’चे पितळ उघडे पडले आहे. उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर टोलविरोधी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आर्किटेक्ट असोसिएशनचे राजेंद्र सावंत, बार असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच ज्या ज्या घटक संस्था या समितीत आहेत, त्यांचे एक प्रतिनिधी या बैठकीस हजर राहणार आहेत. आम्हाला ठोस निर्णय या बैठकीद्वारे हवा आहे. तो जर मिळाला नाही, तर आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी दिला आहे.