कोल्हापूर : गणेशवाडी (ता. करवीर) येथील नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित पती प्रकाश पांडुरंग माने (वय २५), सासरा पांडुरंग ज्ञानदेव माने (५५, दोघे रा. गणेशवाडी) या दोघांना गुरुवारी करवीर पोलिसांनी अटक केली. लता प्रकाश माने (वय २२)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एकूण तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, सासू सायणाबाई पांडुरंग माने हिचा पोलीस शोध घेत आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, मांडरपैकी बेरकळवाडी (ता. करवीर) येथील संभाजी दत्तू बेरकळ यांची मुलगी लता हिचा विवाह चार महिन्यांपूर्वी गणेशवाडीतील प्रकाश माने याच्याबरोबर झाला होता. लग्नात मानपान न केल्याच्या कारणावरून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला.
या त्रासाला कंटाळून मंगळवारी (दि. २०) लता माहेरी बेरकळवाडी येथे आली होती. घरात कोणी नसताना बुधवारी (दि. २१) लताने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली. तिला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणले.
उपचार सुरू असताना लता हिचा रात्री मृत्यू झाला. याबाबत संभाजी बेरकळ (वय ४५) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित प्रकाश माने, पांडुरंग माने व सायनाबाई माने या तिघांवर भारतीय दंडविधान संहिता कलम ३०६, ४९८ (अ), ५०४, ३४ प्रमाणे गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले करीत आहेत.