राजस्थानने गमावलं ते कोल्हापूरने कमावलं, पन्हाळ्यावर ' पद्मावती'चे शुटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 16:16 IST2017-03-09T15:59:02+5:302017-03-09T16:16:46+5:30
राजस्थानमध्ये विरोध झाल्यामुळे वादात सापडलेल्या संजय लीला भन्साळींच्या बहुचर्चित 'पद्मावती'चे शूटिंग आता कोल्हापुरात, पन्हाळ्यावर होत आहे.

राजस्थानने गमावलं ते कोल्हापूरने कमावलं, पन्हाळ्यावर ' पद्मावती'चे शुटिंग
>वादामुळे राजस्थानातून शूटिंग महाराष्ट्रात शिफ्ट...
संदीप आडनाईक, ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ - राजस्थानमध्ये विरोध झाल्यामुळे दिग्दर्शक निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त आणि बहुचर्चित 'द लिजंड आॅफ पद्मावती' या महत्वाकांक्षी हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण आता महाराष्ट्रात, ऐतिहासिक पन्हाळगडाशेजारील मसाई पठारावर सुरु आहे. या चित्रिकरणात अभिनेता शाहीद कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग भाग घेणार आहेत. अजून आठ दिवस या परिसरात चित्रिकरण सुरु राहणार आहे.
राणी पद्मिनी या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे विकृत चित्रण भन्साळी हे त्यांच्या चित्रपटात करत असल्याच्या संशयावरुन जयपूर येथे चित्रपटाच्या सेटवर राजपूत करणी सेना या राजपूत संघटनेने जानेवारीत तोडफोड केली. तसेच भन्साळी यांनाही मारहाण केली होती. त्यापाठोपाठ या संघटनेने चित्रिकरणादरम्यान चितोडगड येथेही राणी पद्मिनीच्या शीशमहल येथे घुसून इतिहास प्रसिध्द आरसेही फोडले होते.
तेराव्या शतकात तत्कालीन दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडगड येथील शीशमहालात राणी पद्मिनीची एक झलक पाहिली होती. यादरम्यान राणी पद्मिनीने या गडावरच जोहार केला होता. या पार्श्वभूमीवर पद्मावतीचे चित्रिकरण जयपूर येथे सुरु असताना संघटनेने तोडफोड केली. पाठोपाठ चितोडगडमधील ऐतिहासिक शीशमहालातील आरसेही फोडल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी राजस्थानात या चित्रपटाचे चित्रिकरण करण्याऐवजी ते महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता हे चित्रिकरण ऐतिहासिक पन्हाळगडाशेजारील मसाई पठारावर सुरु आहे. पन्हाळा आणि परिसरात ऐतिहासिक वास्तू असल्याने या चित्रपटाशी संबंधित अनेक शूटिंग स्पॉट उपलब्ध आहेत. पठारावर स्थानिक लोकांनाही चित्रिकरण परिसरात येण्यास बंदी घातली आहे. या परिसरात स्थानिक पोलिस बंदोबस्तही तैनात केला असून चित्रिकरणासाठी दोनशेहून अधिक घोडे दाखल झाले आहेत. युध्दाच्या प्रसंगाचे चित्रिकरण सुरु असून त्यात व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पाच कॅमे-याद्वारे या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असून ड्रोन कॅमे-याचाही यात वापर केला आहे
पन्हाळगड चित्रिकरणाचे माहेरघर
ऐतिहासिक आणि पौराणिक स्थान म्हणून पन्हाळगड प्रसिध्दच आहे. शिवाय थंड हवेचे ठिकाण म्हणूनही या गडाकडे पर्यटकांची पहिली पसंती असते. हिंदी-मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणाºया कोल्हापुरपासून अवघ्या २0 किलोमीटरवर हे ठिकाण असल्यामुळे या परिसरात सुरुवातीपासूनच अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे चित्रिकरण होत आले आहे. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, लता मंगेशकर या चित्रपट विश्वातील दिग्गज याच ऐतिहासिक पन्हाळगडावर वास्तव्य करुन होते. आजही लता मंगेशकर यांचा बंगला पन्हाळगडावर आहे. तेथे त्या विश्रांतीसाठी येत असतात.याशिवाय बीस साल बाद, राम और श्याम, गोपी या जुन्या हिेंदी चित्रपटासह जीवा, सूत्रधार, राजकपूर यांचा प्रेम ग्रंथ, अलिकडचा आमीर खान अभिनित सरफरोश अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण पन्हाळा येथे झाले आहे.
मसाई पठार प्रसिध्दीच्या झोतात
या चित्रपटाच्या निमित्ताने मसाईचे पठारही प्रसिध्दीच्या झोतात आले आहे. हे विस्तिर्ण पठार असून पाचगणीपेक्षाही सात पटीने मोठे आहे. शिवाय हाताच्या बोटावर स्थानिक शेतक-यांशिवाय या परिसरात कोणीही रहात नाही. त्यामुळे हे पठार अगदीच निर्मनुष्य आहे. त्यामुळे गाजलेल्या हिंदी कलावंतांसाठी हा परिसर एकांताचा आहे. शिवाय या परिसरात चित्रिकरणाशी संबंधित सर्व साहित्याची वाहतूकही करणे सोयीचे असल्यामुळे येथे चित्रिकरण होत आहे.