‘जनसुराज्य’ची रणनीती आता मंगळवारी ठरणार
By Admin | Updated: January 25, 2015 00:50 IST2015-01-25T00:50:57+5:302015-01-25T00:50:57+5:30
वारणानगरला मेळावा : ‘गोकुळ,’ ‘केडीसीसी’ निवडणूक धामधूम

‘जनसुराज्य’ची रणनीती आता मंगळवारी ठरणार
कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाची आगामी ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँक (केडीसीसी) निवडणुकीची रणनीती मंगळवारी (दि. २७) निश्चित होणार आहे. यासाठी पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, हातकणंगलेसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा वारणानगर येथे आयोजित केला आहे. यामध्ये पक्षाने नेमकी कोणती भूमिका घ्यायची याबाबत विचारविनिमय होणार आहे.
‘गोकुळ’ दूध संघासाठी सत्तारूढ गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विरोधात शड्डू ठोकून आव्हान दिल्याने सत्तारूढ गटाने सावध हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सरळ लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या तीन-चार जागा निसटत्या फरकाने पराभूत झाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीसोबत जनसुराज्य, शेकापसारखे पारंपरिक मित्र होते; पण पाच वर्षांत कॉँग्रेस व राष्ट्रवादीत बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादीची अजूनही ‘नरो वा कुंजरो वा’ अशीच भूमिका असल्याने त्यांच्या मित्रपक्षांत संभ्रमावस्था आहे. जनसुराज्य पक्षाच्या पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, हातकणंगले यांसह जिल्ह्यात संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे जनसुराज्य पक्षाच्या भूमिकेला ‘गोकुळ’सह जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत महत्त्व येणार आहे.
जनसुराज्य पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष विनय कोरे यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेशी संलग्न संस्थांचे ठराव गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.
‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाने कोणती भूमिका घ्यावी, यासाठी वारणानगर येथे मंगळवारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये कार्यकर्त्यांची मते अजमावून घेऊन पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)