सोमवारपासून उद्योग तीन शिफ्टमध्ये सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:38+5:302021-05-23T04:24:38+5:30
कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे सक्तीने बंद करावे लागलेले उद्योग सोमवारपासून तीन शिफ्टमध्ये पूर्ववत सुरू होत आहेत. किराणा ...

सोमवारपासून उद्योग तीन शिफ्टमध्ये सुरू होणार
कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे सक्तीने बंद करावे लागलेले उद्योग सोमवारपासून तीन शिफ्टमध्ये पूर्ववत सुरू होत आहेत. किराणा मालासह जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही सकाळी ७ ते ११ या शासनाने घालून दिलेल्या वेळेत सुरू होत आहेत. दरम्यान, सर्वच प्रकारची दुकाने सम-विषमच्या नियमाप्रमाणे सुरू करावीत अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. यासाठी चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाणार आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ३१ मे अखेरच्या लॉकडाऊन अंतर्गत जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू आहे. सर्व उद्योगधंदे नियमांचे पालन करून आणि ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक दुकाने उघडली जात होती, तथापि कोरोनाबाधितांचे आकडे वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने १५ ते २३ मे असा आठ दिवसांचा शंभर टक्के लॉकडाऊन लागू केला. कडक अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे, आस्थापना, सर्व प्रकारची दुकाने बंद राहिली. आज रविवारी लॉकडाऊन संपणार होता. तो वाढणार की संपणार हा संभ्रम शनिवारी संध्याकाळी संपुष्टात आली. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करत असल्याचे जाहीर करून राज्य सरकारचा ३१ मेपर्यंतच्या लॉकडाऊनचे निकष लागू राहतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर उद्योगधंदे व दुकाने सुरु होणार असल्याने थांबलेले जनजीवन पुन्हा एकदा गतिमान होणार आहे.
जिल्ह्यातील शिरोली, गोकूळ शिरगाव, पंचतारांकितसह सर्वच एमआयडीसी बंद होत्या. आता त्या पूर्वीच्या नियमानुसार या एमआयडीसीतील २२५० उद्योग तीन शिफ्टमध्ये सुरू होत आहेत. यात कामगारांची राहण्याच्या सोईसह कोरोना प्रतिबंधात्मक सर्वच उपाययोजनांचे पालन करण्याच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे थांबलेली धडधड पुन्हा सुरु होणार आहे.
चौकट ०१
उद्योजकांमध्ये वेळेवरून नाराजी
उद्योग व्यापार सुरू होत असला तरी वेळेच्या बंधनामुळे उद्याेजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुकानांची सकाळची ७ ते ११ ही वेळ गैरसोईची असल्याने ती ९ ते १ ही करावी अशी मागणी यापूर्वीही उद्योजक, व्यापाऱ्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. आताही याबाबतीत विनंती केली आहे, पण ती ऐकली नाही. त्यामुळे राज्य चेंबर्स ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
चौकट ०२
कृषी सेवा केंद्रामुळे
कृषी सेवा केंद्रासह कृषी औजारांची दुकाने सुरु होणार असल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच ही दुकाने सुरु राहणार आहेत. दरम्यान, कृषी सेवा केंद्रासह कृषी औजारांची तत्सम सेवा पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांनीही दिवसभर दुकाने सुरु ठेवण्याची मुभा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, पण त्यांनी याचा चेंडू शासनाच्या कोर्टात टोलवला आहे. सध्या दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड गैरसोईला सामोरे जावे लागत होते.
चौकट ०३
शासकीय औद्योगिक वसाहती : ३ (शिरोली, गोकूळ शिरगाव, पंचतारांकित)
खासगी सहकारी : ५
फौंड्री : २४०
लहानमोठे उद्योजक : २२५०
कामगार संख्या : १ लाख ३० हजार
औद्योगिक वसाहतनिहाय आकडेवारी
वसाहत उद्योग कामगार
शिरोली १००० ३० हजार
गोकूळ शिरगाव ८०० १५ हजार
पंचतारांकित ४५० ४० हजार
प्रतिक्रिया ०१
शासनाने फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी दिली आहे, ती सरसकट सर्वच दुकानांना देणे गरजेचे आहे. व्यवसाय एकमेकांवर अवलंबून असल्याने ती सरसकट दिली तरच ग्राहक आणि व्यापारी या दोघांनाही फायद्याचे आहे. मागील लॉकडाऊन काळात वापरलेला सम-विषमचा फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरावा, व्यापारी सहकार्य करतील.
संजय शेट्ये, अध्यक्ष, चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज
प्रतिक्रिया ०२
बांधकामे सुरू होणार असली तरी साहित्य विक्रीच्या दुकानांना घातलेली वेळेची मर्यादा अडचणीची ठरणार आहे. पावसाळा तोंडावर असल्याने तत्पूर्वी बेसमेंटची कामे होणे गरजेच आहे, त्यामुळे ही कामे करण्यासाठी पूर्ण दिवस मुभा देण्याची गरज आहे. अन्यथा इमारतींचे फार मोठे नुकसान पावसाळ्यात सोसावे लागणार आहे.
विद्यानंद बेडेकर, क्रीडाई संघटना