सत्तेसाठी कथित करणीने यमगे वेठीस
By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:35+5:302015-07-25T01:14:35+5:30
गावकऱ्यांना जागरण : नागरिक भीतीच्या सावटात

सत्तेसाठी कथित करणीने यमगे वेठीस
मुरगूड : यमगे (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गुरुवारी रात्रभर करणी आणि भानामतीचे प्रकार घडल्याने अख्खा गाव रात्रभर जागा होता. मतदान केंद्राबाहेर, गावच्या हद्दीवर, सर्व गल्ली-बोळांमध्ये करणी-भानामतीचे प्रकार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे दिवसभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सत्ता हस्तगत करण्यासाठी पुढाऱ्यांनी केलेल्या कुरापतीची चर्चा मात्र मुरगूड पंचक्रोशीत सुरू होती.ग्रामपंचायतीच्या सत्तेसाठी मंडलिक, मुश्रीफ, राजे व पाटील गटाची महाआघाडी व संजय घाटगे आणि स्वाभिमानी संघटनेची आघाडी यांच्यामध्ये दुरंगी सामना रंगला आहे. वरवर शांत दिसणाऱ्या या निवडणुकीत शेवटच्या काही दिवसांत चांगलाच रंग भरला आहे; पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे न जाता भानामतीचा आधार घेतला जात आहे. ही गोष्ट पुरोगामी विचारांना मुठमाती देणारीच आहे.
गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गावामधून मोटारसायकलवरून काही व्यक्ती संशयितरीत्या फिरताना काही तरुणांना दिसल्या. त्या मोटारसायकलाच पाठलाग केला असता पाठीमागील व्यक्ती संपूर्ण गल्लीतून रंगीत तांदूळ फेकत असल्याचे निदर्शनास आले. ही घटना बघता बघता सर्वत्र पोहोचली आणि मग दोन्ही गटांचे लोक जागे होऊन गावामधून कथित करणी, भानामतीचे प्रकार शोधू लागले. त्यावेळी धक्कादायक घटना समोर आल्या.
गावातील प्रमुख चौकामध्ये रंगीत तांदळाची विशिष्ट पद्धतीने मांडणी करून त्यांच्यावर टाचण्या मारलेला लिंबू ठेवला होता. नवीन शाळेच्या इमारतीजवळ हळदीमध्ये भिजविलेल्या पिवळ्या कापडामध्ये हाताचे व कवटीचे हाड, त्याला काड्या, तारेने बांधून ठेवलेले आढळले. या करणीचा आपल्या मतदानावर काही परिणाम होऊ नये म्हणून एका गटाच्या प्रमुखांनी त्या साहित्याची विधिवत पूजा करून, नैवेद्य दाखवून पहाटे-पहाटे ते साहित्य वेदगंगा नदीपात्रामध्ये सोडून दिले. गावच्या बाहेर हद्दीवरती असणाऱ्या पपईच्या झाडावर दुपारी लिंबू खिळ्यांच्या सहायाने ठोकलेले आढळले. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीची सत्ता ही केलेल्या विकासकामांच्या लेखाजोख्यावर जिंकायची असते, असे असताना ज्या गावामध्ये घरात एक व्यक्ती पदवीधारक आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत मुरगूड केंद्रामध्ये नेहमी याच गावचे विद्यार्थी चमकत असतात. नोकरीच्या निमित्ताने अनेक तरुण आज परदेशामध्ये मोठमोठ्या पदावर काम करीत आहेत. भजनातून प्रवचनातून मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करणारा वर्ग असताना, अशा यमगे गावामध्ये करणी आणि भानामतीचा प्रकार होणे ही बाब प्रगत समाजाला चिंतनीय आहे हे नक्की.