इचलकरंजीत ‘संगांयो’ अनुदानासाठी जीवावर उदार होऊन गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:25+5:302021-06-01T04:19:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : इचलकरंजीतील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजनेतील विविध लाभार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: ...

इचलकरंजीत ‘संगांयो’ अनुदानासाठी जीवावर उदार होऊन गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : इचलकरंजीतील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजनेतील विविध लाभार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडवला आहे. कोणत्याही प्रकारची काळजी न घेता, अनेकजण याठिकाणी वावरत आहेत. जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे संकट वाढत आहे. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तरीही पेन्शन घेण्यासाठी तोबा गर्दी होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियोजन करणे गरजेचे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासह विविध पेन्शनधारक योजनांतर्गत मिळणारे ५०० ते २००० रुपयांपर्यंतचे अनुदान खात्यावरून काढण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत वयोवृद्धांची मोठी गर्दी होत आहे. दररोज टोकन देऊन बोलावले जात असले तरी नंबर लावून सगळे एकत्र जवळजवळ बसलेले असतात. यावेळी नियम पायदळी तुडवत सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजले आहेत. पेन्शन घेण्यासाठी लांबच-लांब रांगा लागत असून, रस्त्यावरही नागरिक गर्दी करून थांबतात. काहीजणांच्या सोबत आलेलेही त्याच परिसरात गर्दी करून थांबतात. अशाने कोरोना कसा रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चौकट
खात्यावरील पैसे परत जाण्याचा गैरसमज
खात्यावर जमा झालेले पैसे वेळेत काढून न घेतल्यास ते परत जातील, अशी भीती लाभार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. हा गैरसमज असून, पैसे खात्यावरच राहतील आणि आवश्यकता असेल तेव्हा व कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर काढून घेतले तरी चालतील, याबाबतचे प्रबोधन संबंधित लाभार्थ्यांमध्ये करणे आवश्यक आहे.
फोटो ओळी
३१०५२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या आवारात विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत गर्दी केली होती.