मुरगूड शंभर टक्के हागणदारीमुक्त
By Admin | Updated: December 26, 2015 00:15 IST2015-12-25T21:54:47+5:302015-12-26T00:15:18+5:30
पहाटेपासून पाहणी : अधिकाऱ्यांचे समाधान; जिल्हाधिकाऱ्यांना दिला अहवाल

मुरगूड शंभर टक्के हागणदारीमुक्त
मुरगूड : मुरगूड (ता. कागल) शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. गुरुवारी पहाटे प्रांताधिकारी मोनिका सिंह, तहसीलदार शांताराम सांगडे यांच्या पथकाने संपूर्ण शहराची पाहणी करून पालिकेच्या कामावर समाधान व्यक्त केले. पाहणीनंतर मुरगूड शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल या पथकाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. पहाटे चार वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत तब्बल पाच तास या पथकाने शहरातील गल्ली-बोळाची पाहणी केली.
मुरगूड नगरपरिषदेच्या २४ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत शहर हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. त्या पद्धतीचा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता. याला अनुसरून गुरुवारी शासकीय अधिकाऱ्यांनी शहराची पाहणी केली. सर्वांचे स्वागत मुख्याधिकारी बी. एस. जगताप यांनी केले. त्यानंतर भल्या पहाटे या पथकाने चौगले पाणंद, गावभाग, तुकाराम चौक परिसर, माधवनगर, पोलीस स्टेशन परिसर, कन्याशाळा रोड, आंबेडकरनगर, कापशी रोड, बाजारपेठ आदी भागांत हे पथक फिरले. काही ठिकाणी स्वत: मोनिका सिंह यांनी स्वच्छतागृहांची तपासणी केली तसेच फिरस्त्या लोकांच्या वस्तीवर जाऊन नागरिक व महिलांच्या बरोबर संवाद साधून वास्तवता जाणून घेतली. संपूर्ण शहराच्या पाहणीदरम्यान कोठेच उघड्यावर शौचास बसलेले अथवा केलेल्या घटना आढळल्या नाहीत. याशिवाय अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसची पाहणी केली.
पाहणी झाल्यानंतर पालिकेमध्ये सर्वांची बैठक झाली. यामध्ये मुख्याधिकारी बी. एम. जगताप यांनी हागणदारीमुक्तीसाठी केलेले प्रयत्न सांगितले. नागरिकांना वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी आपण प्रोत्साहित केल्याचे सांगून जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून शहरातील महत्त्वाच्या पाच ठिकाणी ३५ सिट्स शौचालये बांधल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत २० शौचालये बांधली असून १० शौचालयांची कामे सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले.
या पथकामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. वाय. तारळकर, सर्कल अधिकारी सुंदर जाधव, तलाठी राम शिंदे, स्वच्छता पाणी विभाग अभियंता अनिल गंदमवाड,
स्वच्छता निरीक्षक दिलीप कांबळे, सूर्याजी भोवळे, भिकाजी कांबळे,
अमर कांबळे, संदीप पाटील, दत्ता कांबळे, अशोक तांबट, अमोल कांबळे, अजित गुरव, आदी प्रमुख सहभागी झाले होते.