तिची उदंड लेकरे - भाग ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:31+5:302021-09-27T04:27:31+5:30

एकीने तर त्या तांदुळाची चकलीची भाजणी करून विकली. हरभऱ्याचे फुटाणे फोडून ते विकले. ‘मोदींना फोनवरून हे सगळं कळवूया. फुकट्या ...

Her great children - Part 3 | तिची उदंड लेकरे - भाग ३

तिची उदंड लेकरे - भाग ३

Next

एकीने तर त्या तांदुळाची चकलीची भाजणी करून विकली. हरभऱ्याचे फुटाणे फोडून ते विकले.

‘मोदींना फोनवरून हे सगळं कळवूया. फुकट्या थाळ्यासुद्धा बंद व्हायला हव्यात. लोकांना तुम्ही आळशी बनवताय. त्यांना स्वस्त द्या, फुकट नको. श्रम केल्यानंतरच अन्न पचतं नि अन्नाची किंमत कळते.’

हा उपाय सर्वांना पटला; पण तो लगेच होणारा नव्हता. ‘आपले राणेसाहेब आता दिल्लीत गेल्यामुळे हा निरोप मोदींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली.’ वाडेकर म्हणाले. आपली समस्या काही पुरुषमंडळींना तरी समजली, ह्याचं जमलेल्या स्त्रियांना समाधान झालं. अन्न उरू नये म्हणून प्रत्येक गृहिणीने आपल्या पातळीवर उपाय शोधावा असं ठरलं.

पुरुष आपापसात बोलत होते. ‘देशात, महापूर, नद्याजोड प्रकल्प असे केव्हढे मोठे प्रॉब्लेम्स आहेत नि ह्या बायकांचा किती क्षुल्लक प्रॉब्लेम, नि केव्हढी ओरड. अन्न कमी शिजवा म्हणावं, आम्हाला नाही उरलं तर आम्ही बाहेर जाऊ. तेव्हढाच बदल. होय की नाही इनामदार?’

आणि कॉलनीतल्या काही वहिन्यांपर्यंत एक आनंदाची वार्ता पोहचली. काय? तर म्हणे ‘सुशीला निलाखे नावाच्या एक बाई आहेत. त्या पलीकडच्या गल्लीत राहातात. त्यांचं कुटुंब मोठं आहे. त्या तुमच्या घरातलं उरलेलं घेऊन जातील. त्या आपले डबे आणतील. त्यांचा मोबाईल नं. = = = = हा आहे. त्यांना कॉल करून बोलवा.’

हा मेसेज सगळ्या वहिन्यांकडे आला. सगळ्यांना खूप आनंद झाला. सुशीला निलाखेना कॉलवर कॉल येऊ लागले. त्या उरलंसुरलं नेऊ लागल्या. एके दिवशी सुलभाताईंकडे नातीचा वाढदिवस होता. बरीच उराऊर झाली होती. गुलाबजामसारखे टिकणारे जिन्नस त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले. पण मसालेभात, कोशिंबिरी, बटाट्याची भाजी बरीच उरली होती. त्यानी सुशीला निलाखेना कळवलं, उरलेलं घेऊन मीच येते. त्या स्कूटरवरून खाली उतरल्या. सुशीलाबाई तिथे फेमस होत्या. त्यामुळे घर सापडायला वेळ लागला नाही. ती एक मोठी झोपडपट्टी होती. सुशीलाबाईंबरोबर त्यांचा नवरा काम करीत होता. फाटक्या कपड्यातली, केस न विंचरलेली, शेंबडी, काळी सावळी साताठ मुलं रांगेत बसली होती. साधारण पाच ते दहा वयाची असतील. सुशीलाबाई पत्रावळीवर डब्यातलं अन्न वाढत होत्या. नवरा एकेक पत्रावळ मुलांच्या समोर ठेवत होता. मुलं आशाळभूतपणे त्या पदार्थांकडे बघत होती. सुलभाताईंनी आपण आणलेल्या अन्नाचे डबे सुशीलाबाईंना दिले. मुलं बकबका जेवू लागली होती. ‘बगा, किती भुकेजली हायीत पोरं. कोनाचे आयबा न्हाईत. कोनाचे रानात कामाला जात्यात.. ह्यांना हिथ सोडून. तुमच्या कडून आनलेले सगळे पदार्थ मी गरम करते. आमटी, कढी उकळते. नि ह्यांना वाढते’. मुलं उठली त्यांच्या पत्रावळी सुशीलाबाईच्या नवऱ्याने घट्टमुट्ट गुडाळल्या नि झाडांच्या मुळात टाकल्या. मग दहा-बारा कुत्री आली.’ तुमच्याकडून आलेलं अगदी शिळं, पोरांनी टाकलेलं खरकटं ही कुत्री खातात. ही भटकी म्हणून ह्यांना कोनी घालत न्हाईत. त्यांचं पोट इथे भरतं.’ सुशीलाबाईचा नवरा म्हणाला.

सुलभाताई तो सगळा प्रकार बघतच राहिल्या. ‘निलाखे बाई, तुम्ही फार चांगलं काम करता आहात.

रॉबिन हूड नावाची एक संस्था हेच काम करते. हॉटेल मधलं किंवा विवाह कार्यालयातलं उरलेलं अन्न ते झोपडपट्ट्यांचा शोध घेऊन तिथल्या भुकेलेल्यांना वाढतात. पण मला असं सांगा, ह्या मुलांच्या घरी सरकारी धान्य मिळत नाही?

‘ही भटकी आहेत ना ह्यांच्याकडे रेशनकार्ड न्हाई.’

‘ती तुम्ही कोणती संस्था म्हणता ती आम्हाला ठाऊक न्हाई. आम्ही आमच्या मनाने हे सुरू केलं.

आम्हाला सोताची पोरं न्हाईत. हीच आमची लेकरं.’

‘उदंड लेकरं आहेत की तुम्हाला. आम्हाला सांगा काही मदत हवी तर’, असं म्हणून सुलभाताई घरी आल्या. आपल्या वर्तुळाबाहेर येऊन आपल्यालाही असं काही करता येईल का हा विचार त्यांच्या मनात घोळत राहिला.

Web Title: Her great children - Part 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.