गुरुजींच्या राजकारणाची जिल्ह्यात उत्कंठा
By Admin | Updated: April 2, 2015 00:37 IST2015-04-01T23:53:16+5:302015-04-02T00:37:39+5:30
उद्या मतदान : तालुकावार शिक्षक मेळावे, पदफेऱ्या, प्रत्यक्ष गाठीभेटी, सोशल मीडियाचा वापर

गुरुजींच्या राजकारणाची जिल्ह्यात उत्कंठा
अशोक खाडे - कुंभोज -प्राथमिक शिक्षकांची शिखर बॅँक समजल्या जाणाऱ्या शिक्षक बॅँकेसाठी उद्या, शुक्रवारी सतरा जागांसाठी मतदान होत आहे. तालुकावार शिक्षक मेळावे, पदफेऱ्या, प्रत्यक्ष गाठीभेटी तसेच सोशल मीडियाद्वारे गुरुजींनी प्रचाराचे अक्षरश: रान उठविले आहे. शिक्षक संघ समिती तसेच पुरोगामी संघटनेतील नाराजांचे बळ समविचारी पॅनेलला मिळाल्याने निवडणुकीत अनपेक्षितपणे अधिकच रंग भरला आहे. संघटनांपेक्षा गुरुजींनी व्यक्तिगत प्रतिष्ठेच्या बनविलेल्या या निवडणुकीत वरुटेंचे ‘विमान’ भरारी घेणार, समविचारीचा ‘पतंग’ झेपावणार, की सभासद ‘कपबशीला’ पसंती देऊन बॅँकेत परिवर्तन घडवितात, याबाबत संपूर्ण जिल्ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
६८२३ सभासद संख्या असणाऱ्या दि प्राथमिक शिक्षक बॅँकेत सर्वसाधारण १२, राखीव गटातील ५ अशा १७ जागांसाठी ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजाराम वरुटे, पांडुरंग केणे, राजमोहन पाटील या तीन विद्यमानांसह बॅँकेचे माजी अध्यक्ष जीवन मिठारी, उपाध्यक्ष बळवंत पोवार, विद्यमान संचालक रघुनाथ खोत, शोभा पाटील निवडणूक लढवीत आहेत.
संघाचे सत्तारूढ पॅनेल, शिक्षक समिती, मागासवर्गीय संघटना, पुरोगामीचे शाहू परिवर्तन तसेच संघाच्या थोरात गटाच्या समविचारी पॅनेल दरम्यान प्रामुख्याने होणाऱ्या लढतीत पाचजणांच्या स्वाभिमानी पुरोगामी आघाडीसह अन्य ११ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.
पॅनेल रचनेदरम्यान नाराज झालेल्या संघाच्या वरुटे गटातील संचालक रवी पाटील, रघुनाथ खोत, बी. एस. पाटील, शाहूवाडीचे मोहिते, समितीचे जोतिराम पाटील, पुरोगामीचे रवी शेंडे हे सर्वजण थोरात गटाला मिळाल्याने संघ, समिती व पुरोगामीला धक्का बसला. तथापि, अनपेक्षितपणे ‘समविचारी’ पॅनेलला बळ मिळाल्याने अन्य दोन्ही पॅनेलसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
सर्वसाधारण गटातील बारा जागांसाठी निवडणूक होत असलेल्या करवीर तालुक्यात बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष राजाराम वरुटे, पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील तसेच थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील यांच्यात प्रतिष्ठेची तिरंगी लढत होणार आहे.
हातकणंगले जागाविक्री प्रकरण कळीचे ठरल्याने केवळ याच मुद्द्यावर इथली लढत विद्यमान संचालक राजमोहन पाटील, परिवर्तन पॅनेलचे अर्जुन पाटील तसेच समविचारीचे एन. वाय. पाटील यांच्यादरम्यान लक्षवेधी ठरणार आहे.
शिरोळमध्ये विद्यमान संचालक रवी पाटील यांच्याशिवाय लढणाऱ्या संघास इथली लढत जड जाण्याची चिन्हे आहेत. परिवर्तन पॅनेलने इथे दोन उमेदवार दिल्याने तसेच समविचारीला रवी पाटील गटाची ताकद मिळाल्याने उमेदवार तुल्यबळ असूनही इथली लढत व्यक्तीप्रतिष्ठेभोवती गुरफटण्याची चिन्हे आहेत.
पन्हाळ्यात विद्यमान संचालक रघुनाथ खोत समविचारातून लढत असून, भिवाजी काटकर यांची उमेदवारी नसल्याने नाराजीमुळे व्यक्ती पाहून होणाऱ्या संभाव्य मतदानाबाबत पॅनेलप्रमुख चिंतित आहेत.
शाहूवाडीतील तिरंगी लढतीत उमेदवारांची कसोटी, तर सभासदांच्या संघटना निष्ठेचा कस लागणार आहे. राधानगरीत पुरोगामीत काहीशी नाराजी असून, संघाचे विद्यमान संचालक बी. एस. पाटील, समितीचे जोतिराम पाटील यांनी समविचारीत प्रवेश केल्याने इथे समविचारीला अन्य दोहोंचे आव्हान निर्माण झाले आहे.
भुदरगडमध्ये होणाऱ्या तिरंगी लढतीत समान संधी निर्माण झाली आहे. कागल तालुक्यात गुरुजींच्या राजकारणाला गटातटाची झालर असल्याने इथली तिरंगी लढत चुरशीची होईल अशी चिन्हे आहेत. चंदगडमध्ये शंकरराव मनवाडकर यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांना संघ व समविचारीचे आव्हान राहणार आहे. आजरा तालुक्यात रवी शेंडे पुरोगामीतून समविचारीत गेल्याने इथल्या चौरंगी लढतीत उमेदवारांपेक्षा संघटनांचा कस लागणार आहे.
गडहिंग्लजमध्ये तिरंगी लढतीत उमेदवाराचे व्यक्तिगत वलय महत्त्वाचे ठरणार आहे. गगनबावड्याची लढत व्यक्तीबरोबर खरी संघटनास्तरावर प्रतिष्ठेची होणार आहे. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच महिलांनी प्रचाराचे रान उठविले आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप कळीचा मुद्दा
जिल्हा पॅनेल रचना असल्याने उमेदवारांची स्वत:च्या तालुक्यासोबत अन्य तालुक्यांवरही भिस्त असल्याने प्रचारार्थ संपूर्ण जिल्हा पिंजला गेला. बॅँकेची निवडणूक संघटनांनी प्रतिष्ठेची बनविल्याने तसेच बॅँकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रंगलेल्या प्रचाराने जिल्हा ढवळून निघाला.