पालकमंत्री जनतेच्या गराड्यात
By Admin | Updated: January 25, 2015 00:49 IST2015-01-25T00:49:21+5:302015-01-25T00:49:21+5:30
जनता दरबार : दोन हजार लोकांचे म्हणणे घेतले ऐकून

पालकमंत्री जनतेच्या गराड्यात
कोल्हापूर : जवळपास एक तप झाल्यानंतर कोल्हापूरला जिल्ह्यातीलच मंत्री पालकमंत्री म्हणून लाभल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा खूपच उंचावलेल्या आहेत. त्याचे प्रत्यंतर येत असल्याचे आज, शनिवारी शासकीय विश्रामगृहावर पाहायला मिळाले. राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे दोन हजार लोकांनी भेटून आपल्या तक्रारी त्यांच्या कानांवर घातल्या; तसेच मागण्यांची निवेदने दिली. दादा दिवसभर जनतेच्या गराड्यातच कार्यमग्न होते.
गेल्या बारा वर्षांपासून पालकमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती झाली होती; परंतु ते केवळ वर्षातून चार वेळा आणि एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असला तरच कोल्हापुरात येत असत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांना लोकांना भेटता येत नसे. ज्यांना शक्य आहे ते मुंबईला जाऊन भेटत; त्यामुळे पालकमंत्री असूनही येथील शासनदरबारी जनतेची कामे होत नसत; परंतु राज्यात सत्तांतर झाल्यावर चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री होण्याचा मान मिळाला. ते कोल्हापुरातीलच असल्याने त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
आज पालकमंत्री शासकीय विश्रामगृहावर सकाळी दहा वाजल्यापासून थांबले होते. सायंकाळी पाच वाजता पुढील कार्यक्रमास जायचे असल्याने त्यांनी आपला जनता दरबार थांबविला. भेटीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ते ऐकून घेत होते. निवेदनाचा स्वीकार करीत होते. भेटीला येणाऱ्या सर्वांना एक टोकन देण्यात आले होते. टोकन क्रमांकानुसार नागरिक भेटत होते. गर्दीत व्यस्त असतानाच त्यांनी दुपारचे भोजन घेतले. लागलीच ते कामालाही लागले.
गर्दीतून पुढे येणाऱ्यांत कोणाची वैयक्तिक, तर कोणाची सार्वजनिक कामे होती. कोणी संस्थेच्या कामाबाबत भेटत होते, तर कोणी भागातील रस्त्यांसाठी, अन्य नागरी सुविधांसाठी निधीची मागणी करीत होते. वैयक्तिक कामांमध्ये प्रामुख्याने बदली, बढती, थकीत पगार, थकीत फरक यांचीही निवेदने दिली गेली. पालकमंत्र्यांसोबत व्यासपीठावर करवीर प्रांत प्रशांत पाटील, डीडीआर सुनील शिरापूरकर, महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील उपस्थित होते. गणेश देसाई, विजय जाधव, राहुल चिकोडे, आदी कार्यकर्ते नागरिकांना मदत करीत होते. सायंकाळी पाच वाजता पालकमंत्र्यांनी पुढच्या कार्यक्रमाकडे जाण्याचा निर्णय घेतला तशी शासकीय विश्रामगृहावरील गर्दी कमी झाली. (प्रतिनिधी)