यळगूडमध्ये कडकडीत बंद
By Admin | Updated: September 14, 2015 00:18 IST2015-09-14T00:16:52+5:302015-09-14T00:18:59+5:30
अतिक्रमण निर्मूलन वाद : चुकीच्या गुन्ह्यांचा निषेध; सरपंच, सदस्यांविरोधात गुन्हे

यळगूडमध्ये कडकडीत बंद
हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील अंबाबाईनगर वसाहतीमध्ये घराचे बेकायदा बांधकाम थांबविण्यासाठी गेलेल्या सरपंच वंदना दादासो पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना मिरचीपूड टाकून मारहाण झाली होती; मात्र त्यांच्यावरच चुकीच्या पद्धतीने हुपरी पोलिसांत विविध गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ रविवारी यळगूडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटांच्या १८ जणांविरोधात विनयभंग, चोरी, मारहाण अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत; मात्र कोणालाही अटक झाली नाही.
सरपंच वंदना पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे, सत्ताधारी गटाचे नेते आण्णासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य शीतल बागल, वसंत शिंदे, अझहर मुल्लाणी तसेच दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासो दबडे, हुपरी शहरप्रमुख सुनील कोरे, ज्योती गणेश रजपूत, नौतान मिणेकर, छनौ रावळकर, कुंदन नवले, गणेश रजपूत, राहुल परकारे, सुनील घस्ते, सुभाष रजपूत, सारिका व सुरेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) अशा दोन्ही गटांच्या १८ जणांचा यामध्ये समावेश आहे. सरपंच वंदना पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की, अंबाबाईनगर वसाहतीमध्ये गणेश सुभाष रजपूत यांनी गट नंबर २८१ मध्ये बेकायदेशीररीत्या सुरूकेलेले घराचे बांधकाम थांबविण्यासाठी आम्ही गेलो, त्यावेळी गणेश व ज्योती रजपूत यांनी आपल्या नातेवाइकांसह आमच्यावर मिरचीपूड टाकून हल्ला केला, तर ग्रामपंचायत महिला
कर्मचाऱ्याचा विनयभंग करून त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आहे. ज्योती गणेश रजपूत यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, झोपडीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आमच्याशी वाद घालून काम थांबविले व आम्हाला मारहाण केली. आण्णासो पाटील व सदस्य वसंत शिंदे यांनी विनयभंग केला.