‘टोल’ हद्दपार करणारच.. गोविंद पानसरे : बस वाहतूक संघटनेतर्फे सभा
By Admin | Updated: May 18, 2014 00:47 IST2014-05-18T00:43:22+5:302014-05-18T00:47:52+5:30
कोल्हापूर : मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील, मुख्यमंत्री येऊदेत किंवा कोर्ट सांगू दे; टोलला हद्दपार केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, असा इशारा टोलविरोधी कृती समितीचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी दिला.

‘टोल’ हद्दपार करणारच.. गोविंद पानसरे : बस वाहतूक संघटनेतर्फे सभा
कोल्हापूर : मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील, मुख्यमंत्री येऊदेत किंवा कोर्ट सांगू दे; टोलला हद्दपार केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, असा इशारा टोलविरोधी कृती समितीचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी दिला. टोलविरोधी कृती समितीच्या वतीने टोलविरोधात पुन्हा एकदा ९ जून रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून जनजागृती करण्यासाठी आज, शनिवारी महालक्ष्मी चेंबर्स येथे कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेतर्फे टोलविरोधी पहिली सभा घेण्यात आली. त्या सभेत मार्गदर्शन करताना हा निर्धार करण्यात आला. पानसरे म्हणाले, लाकडावर एकदा घाव घालून ते मोडत नाही; तर त्या लाकडावर अनेक वेळेला घाव घालावे लागतात. त्याचप्रमाणे टोलविरोधात अनेक वेळा आंदोलन केल्यानंतरच टोल हद्दपार होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, जोरदार घाव घालावा; तरच टोल हद्दपार होणार आहे. चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारला धोरण बदलावे लागेल असे जनआंदोलन आता उसळले पाहिजे. ज्यांची चारचाकी गाडी नाही, तेच या आंदोलनात जास्त आहेत. आता ज्यांची चारचाकी गाडी आहे, त्यांनी पूर्ण ताकदीने आंदोलनात उतरले पाहिजे. दिलीप पवार म्हणाले, सामान्य माणसाला शहरात ये-जा करण्यासाठी टोलमुळे अडचण येत आहे. सामान्य माणसासाठी आम्ही लढणार आहोत, कोणीही येऊ दे; हे आंदोलन आता थांबणार नाही. बाबा इंदुलकर म्हणाले, कायदा आमच्यासाठी आहे. कायद्यासाठी आम्ही नाही. शासनाने कोल्हापुरातून टोलचे भूत काढून टाकावे. वेळीच जागे व्हावे अन्यथा शासनकर्त्यांना सत्तेपासून १० ते १५ वर्षांचा उपवास करावा लागेल. यावेळी महापौर सुनीता राऊत, माजी महापौर वंदना बुचडे, माजी नगरसेविका मनीषा बुचडे, रघुनाथ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले.