शेतीसाठी १६ तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 02:29 IST2016-05-10T01:47:09+5:302016-05-10T02:29:48+5:30

सतेज पाटील : फेर वाढवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Give 16 hours of electricity for agriculture | शेतीसाठी १६ तास वीज द्या

शेतीसाठी १६ तास वीज द्या

कोल्हापूर : पाण्याचा फेर लांबणीवर पडल्याने पंचगंगा, दुधगंगा आणि भोगावती खोऱ्यातील उभी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. यासाठी पाण्याचा फेर वाढवून किमान १६ तास वीज द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली. यावर लवकरच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.शेतीसाठी उपसा कालावधीमध्ये भारनियमन नसावे व किमान १६ तास वीज उपलब्ध करून द्यावी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी ही मागणी केली. जिल्हाधिकारी सैनी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सध्या दहा दिवसांचा पाणी उपसा कालावधी असून, यामध्येही वारंवार भारनियमन होत आहे. त्यामुळे शेतीला कमी दाबाने पाणी मिळत आहे. १ ते १० मे या दहा दिवसांच्या पाणी उपसा कालावधीतही वारंवार भारनियमन होत असल्याने उपसा चालू असूनही शेतीला पाणी मिळत नाही.
शिवाय पाण्याचा फेर लांबणीवर पडल्याने पिके करपू लागली आहेत. त्यातच पाणी उपसाबंदीचा कालावधी आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात येत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतीला पाणी नसल्याने शेती पिकवायची कशी? अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे.
हे चित्र जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणून पंचगंगा, दुधगंगा, भोगावती खोऱ्यांमध्ये उपसाबंदी लागू आहे. मात्र, दहा दिवसांच्या उपसा कालावधीतही शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
यामुळे उपसाबंदीबाबत योग्य नियोजन करा, उपसा कालावधीत १६ तास अखंडपणे वीज द्या, उपसा कालावधीचा फेर किमान दोन दिवसांनी वाढवावा, अशी
मागणी आबददार सतेज पाटील यांनी यावेळी केली.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील
यांनी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाणी शेतीसाठी देण्याबाबत नियोजन करू, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता युवराज जरग, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Give 16 hours of electricity for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.