कन्यागत महापर्वसाठी निधी कमी पडणार नाही
By Admin | Updated: September 5, 2015 00:30 IST2015-09-05T00:29:56+5:302015-09-05T00:30:07+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याच्या नियोजनासाठी बैठक

कन्यागत महापर्वसाठी निधी कमी पडणार नाही
नृसिंहवाडी : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र नृसिंहवाडीला २०१६ साली होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळासाठी विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, याबाबतचा अहवाल आठ दिवसांच्या आत सर्व शासकीय खात्याच्या अधिकारी यांनी लाल फितीत न अडकवता जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, नववा दिवस लावू नये, असा सज्जड इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कन्यागत नियोजन बैठकीत दिला. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त देव संस्थानच्या भक्तनिवास हॉलमध्ये पुढील वर्षी आॅगस्ट २०१६ साली होणाऱ्या ‘कन्यागत महापर्वकाळ’ सोहळ्याच्या नियोजन बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पालकमंत्री पाटील यांनी दर दोन महिन्यांनी प्रांताधिकारी यांनी व चार महिन्यांनी जिल्हाधिकारी यांनी कन्यागत महापर्वकाळ याबाबत आढावा बैठक घेऊन कामाला गती द्यावी, असे सांगितले.
खासदार राजू शेट्टी यांनी नृसिंहवाडीकडे चारही बाजंूनी येणारे रस्ते करून घेणे गरजेचे असून हा सोहळा सर्वांनी मिळून पार पाडण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करूया, असे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, कन्यागत पर्वकाळसाठी त्या त्या विभागाने वस्तुनिष्ठ आराखडा तयार करून किती निधी लागेल याचा अहवाल आमच्याकडे सादर करा, आम्ही कोणत्या विभागाकडून किती निधी देता येईल, हे पाहून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू, असे सांगितले.
खासदार प्रकाश हुक्किरे म्हणाले, तेवीस कोटी रुपये खर्चाच्या खिद्रापूर-जुगुळ पुलाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. दहा गुंठे जमीन नृसिंहवाडी येथे दिल्यास आम्ही पाच कोटी रुपये खर्च करून भक्तनिवास बांधून देण्याची तयारी आहे. आमदार उल्हास पाटील म्हणाले, गेले तीन महिने मी या नियोजन बैठकीसाठी प्रयत्नशील आहे. कन्यागत महापर्वकाळासाठी नृसिंहवाडीसह शिरोळ येथील दत्त भोजनपात्र, औरवाड येथील अमरेश्वर मंदिर, गणेशवाडी येथील पुरातन गणेश मंदिर, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी साठ कोटी इतक्या रकमेची आवश्यकता असून, शासनाने ती लवकरात लवकर मंजूर करावी. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अविनाश सुभेदार यांचीही भाषणे झाली. दत्त देव संस्थानचे सचिव राजेश खोंबारे यांनी नृसिंहवाडी येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडील असलेला ‘नगारखाना’ दत्त देव संस्थानकडे वर्ग करावा, अशी मागणी करून दत्त मंदिरासमोरील फ्लॅटफॉर्म विस्तारित करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार सचिन गिरी, नायब तहसीलदार वैभव पिलारी, आदी उपस्थित होते.
'अन् सीमाप्रश्नाची आठवण झाली
कन्यागत नियोजन बैठकीत खासदार प्रकाश हुक्किरे यांनी कर्नाटकातून लाखो भाविक दत्त दर्शनासाठी महाराष्ट्रामध्ये येतात यासाठी आम्ही आंतरराज्य दळणवळणासाठी पाच मोठे पूल बांधले असे सांगितले. हाच धागा पकडून खासदार राजू शेट्टी यांनी त्याशिवाय सीमाभागातील गावे महाराष्ट्रामध्ये कशी येणार, असा टोला मारला. यावर पलटवार करत खासदार हुक्किरे यांनी विकासकामांत राजकारण आणू नका. तुम्ही वेगळ्या पक्षाचे आणि आम्ही वेगळ्या पक्षाचे आहोत. तुम्ही फक्त आम्हाला पाडायला कर्नाटकात येता, पण दत्त कृपेने आम्ही पडलो नाही आणि पडणारही नाही, असे म्हणताच उपस्थितात हंशा पिकला.