‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ आक्रमक
By Admin | Updated: May 22, 2015 00:09 IST2015-05-21T23:47:35+5:302015-05-22T00:09:59+5:30
ठिकठिकाणी आंदोलने : दहा दिवसांत बिले अदा न केल्यास पुन्हा उग्र आंदोलनाचा इशारा

‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ आक्रमक
कोल्हापूर : २०१४-१५ च्या चालू गळीत हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे थकीत ऊस बिले जिल्ह्यातील सर्व कारखान्यांकडून त्वरित मिळावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी चांगलीच आक्रमक बनली. संघटनेच्या वतीने तालुक्यांच्या ठिकाणी धरणे, निदर्शने व ठिय्या आंदोलने करण्यात आली.
शिरोळ येथे धरणे आंदोलन
शिरोळ : २०१४-१५ च्या चालू गळीत हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे थकीत ऊस बिले त्वरित मिळावीत, या मागणीसाठी गुरुवारी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ज्या कारखान्यांनी बिले दिली नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन गिरी यांना देण्यात आले. दहा दिवसांत थकीत बिले अदा केली नाहीत, तर ‘स्वाभिमानी’च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४-१५ चा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरी उसाची थकीत बिले साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे.
आंदोलनात जिल्हा परिषदेचे सदस्य सावकर मादनाईक, सुरेश कांबळे, आण्णासाहेब चौगुले, सुवर्णा अपराज, बंडू पाटील, महेश पाटील, रामचंद्र फुलारे, सीमा पाटील, शीला पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
करवीर तहसीलसमोर आंदोलन
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भोगावती, कुंभी, राजाराम या साखर कारखान्यांनी उसाचे गाळप होऊन दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. याविरोधात गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करवीर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. येत्या दहा दिवसांत कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सरचिटणीस जनार्दन पाटील, विलास पाटील, विक्रम पाटील, संभाजी कोळी, आदी उपस्थित होते.
हातकणंगलेत उपोषण
हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे ्नगुरूवारी लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमोद कदम, अरुण मगदूम, संतोष जाधव, वैभव कांबळे, सुरेश पाटील, शिवाजी माने, डॉ. विनोद चौगुले, रामराव पाटील, सत्त्वशिल जाधव, धनाजी पाटील, सुनील देसाई, यांसह स्वाभिमानी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहूवाडी तहसीलसमोर ठिय्या
मलकापूर : आधारभूत (एफआरपी) प्रमाणे ऊस उत्पादकांची बिले वेळेवर द्यावीत, या मागणीसाठी शाहूवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात वसंत पाटील, भीमराव पाटील, शामराव पाटील, आदींसह शेतकरी सामील झाले होते.
चंदगडमध्ये लाक्षणिक धरणे
चंदगड : चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथील हेमरस व म्हाळुंगे येथील इको-केन शुगर्स या कारखान्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे पहिली उचल न दिल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, उपाध्यक्ष जगन्नाथ हुलजी, जोतिबा पाटील, आदी उपस्थित होते.
भुदगरड तहसिलसमोर उपोषण
गारगोटी : साखर कारखान्यांनी या वषार्तील ऊस बिले एफ.आर.पी.प्रमाणे आजतागायत वेळेत न दिल्याबद्दल एक दिवसीय लाक्षणिक उपोषण भुदरगड तहसिल समोर करण्यात आले. तालुकाध्यक्ष नितीन पोवार व जिल्हा सरचिटणीस एकनाथ जठार यांच्या पुढाकाराने गुरुवारीकरण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात संभाजी देसाई, विश्वास पाटील, मायका डिसोझा, निवृत्ती मिसाळ, ईश्वरा आरडे, दशरथ पाटील, नामदेव भाटले व शेतकरी वर्ग सहभागी झाला होता.
राधानगरीत निदर्शने
‘एफआरपी’ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांची उसाची थकीत बिले तत्काळ देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याबाबत कार्यवाही न झाल्यास शेतकरी हिंसक व उग्र आंदोलन करतील, असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, पंचायत समितीचे सदस्य अजित पोवार, मालोजी जाधव यांनी केले.