कोल्हापूर : राधानगरीधरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाची विसर्ग क्षमता वाढवण्यासाठी मुख्य धरण व स्वयंचलित दरवाजे यांच्यामध्ये असलेल्या टेकडीमध्ये बारा बाय आठ मीटर आकाराची ३ वक्र दरवाजे बसवण्यात येणार आहेत. या कामाचे अंदाजपत्रक तयार करुन राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या मान्यतेने प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा कमीत कमी ठेवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू छत्रपती, आमदार अमल महाडिक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अभियंता अभिजित म्हेत्रे, ऋतुराज इंगळे व सुहास निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी शाहू छत्रपती यांनी धरणातील पाणीसाठा, वीजनिर्मिती प्रकल्प याची माहिती घेतली.जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, चालू हंगामामधील धरणामध्ये जास्त प्रमाणात पाणी शिल्लक आहे.मे महिन्यामध्ये अतिरिक्त पाऊस लागल्याने धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक राहिला तसेच पंचगंगा नदीतील को.प.बंधाऱ्यातील बरगे काढण्यास अडचण निर्माण झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बरगे काढून धरणातून २५00 क्यूसेक्स विसर्ग चालू केला आहे. पावसाचा अंदाज घेत विसर्ग जास्तीत जास्त दिवस ठेवून धरणातील पाणीसाठा कमी करण्याचे नियोजन आहे.आमदार अमल महाडिक म्हणाले, महापूर नियंत्रणासाठीच्या राधानगरी धरणाची कामे जागतिक बँकेच्या सहकार्याने होत असलेल्या ३२00 कोटींच्या प्रकल्पांतर्गत समाविष्ट केली आहेत. याचे सविस्तर संकल्पने व आराखडे तयार होत आहेत. त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळम्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.अभिजीत म्हेत्रे म्हणाले, धरणावरील ५ सेवाद्वारांपैकी २ सेवाद्वारे बंद केल्याने विसर्ग क्षमता १६०० क्युसेक्सपर्यंत घटली आहे. उर्वरित ३ सेवाद्वारे ही फारच जुनी झाल्याने येथे हायड्रॉलिक होयिस्ट यंत्रणा बसवण्यात येणार आहे. राधानगरी धरणस्थळावरील जुने वीजनिर्मिती केंद्र महाजनको यांच्या अखत्यारीत असून, ते २०१७ पासून बंद आहे. केंद्र चालू करण्यासाठी महाजनकोकडे विनंती केली आहे.
Kolhapur: राधानगरी धरणाच्या वक्राकार दरवाजांचा प्रस्ताव शासनाला सादर, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:20 IST