विजेेचा धक्का बसून पूरग्रस्त महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:07+5:302021-07-30T04:25:07+5:30
दानोळी : कवठेसार (ता. शिरोळ) येथील मंगल दादासो फरांडे (वय ६५) या महिलेचा टँकरमधून मोटरने पाणी भरत असताना ...

विजेेचा धक्का बसून पूरग्रस्त महिलेचा मृत्यू
दानोळी : कवठेसार (ता. शिरोळ) येथील मंगल दादासो फरांडे (वय ६५) या महिलेचा टँकरमधून मोटरने पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याविषयी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे गावातील नळपाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी कुंभोजच्या नीलकमल वॉटर सप्लायर्सकडून गेल्या दोन दिवसांपासून टँकरने पाणी विक्री केली जात होती. या टँकरलाच विद्युत मोटर जोडलेली आहे. पण मोटर सुरू केल्यास टँकर व पाण्यातून करंट येत आहे, असे दोन दिवसांपासून टँकर चालकाला सांगितले होते, पण त्याने याकडे दुर्लक्ष केले.
गुरुवारी सकाळी मंगल फरांडे या पाणी भरण्यासाठी टँकरजवळ गेल्या असता, त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. शांतीनाथ फरांडे यांनी जयसिंगपूर पोलिसात या घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळाचा सहाय्यक फौजदार एम. बी. कोळी, कॉन्स्टेबल मंगेश पाटील, पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांनी पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. जयसिंगपूर येथे विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
चौकट
माझी यात पीएचडी झाली आहे
टँकरला करंट येत आहे, मोटरला काही झाले आहे का बघा? असे टँकर चालकाला ग्रामस्थांनी सांगितले असता, त्याला काही होत नाही. माझी यात पीएचडी झाली आहे, असे टँकर चालक सांगत होता. त्याच्या दुर्लक्षामुळे एका महिलेला प्राण गमवावे लागल्याची चर्चा घटनास्थळी होती.