पन्नास टक्के शिवार पाण्यापासून वंचित
By Admin | Updated: April 8, 2017 00:46 IST2017-04-08T00:41:32+5:302017-04-08T00:46:24+5:30
लाभक्षेत्रात कमतरता : तळवडे बांधाऱ्याचे बरगे सहा वर्षांपासून गायब

पन्नास टक्के शिवार पाण्यापासून वंचित
आर. एस. लाड ल्ल आंबा
कडवी नदीवर आंबा ते मलकापूर दरम्यान तळवडे, हुंबवली, घोळलवडे, जावली, वाघमळा, खोतवाडी, सुतारवाडी, निळे, मलकापूर, कोपार्डे, शिरगाव येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांद्वारे पाणी अडवून लाभ क्षेत्रात सिंचन केले जात आहे. ‘हेड टू टेल’ या तत्त्वावर पाणीसाठा करणारे धोरण पाटबंधारे विभागाचे असले तरी नदीतील गाळ, झाडे-झुडुपे, तीव्र उन्हाळा तसेच शेतकऱ्यांची पाणी देणारी बेफिकिरी यामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शिवार शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे. बंधाऱ्यांची गळती, गवताने आच्छादलेले पात्र यामुळे पाण्याचा साठा कमी होतो. तळवडे येथील बंधाऱ्याचे बरगे तर गेल्या सहा वर्षांपासून गायब आहेत.
या नदीक्षेत्रातील मानोली, चांदोली, कासार्डे, पालेश्वर धरणात व कडवी मध्यम प्रकल्पात अडीच टीएमसी पाणीसाठा आहे. कडवी धरणावर दोन वर्षांपासून वीजनिर्मिती सुरू असल्याने येथील सिंचनासाठी पाणी कमी पडताना दिसते. मानोली धरणांतर्गत ६४0५ हेक्टर क्षेत्रापैकी ३३७३ हेक्टर, चांदोली धरणाखाली ४६८ हेक्टर पैकी २७२ हेक्टर, तर कासार्डे धरणाखालील ८४७ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ९0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. पालेश्वर धरणाच्या ६१६0 हेक्टर क्षेत्रापौकी २४७३ हेक्टर क्षेत्र भिजते. उर्वरित ७६७२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणायचे असेल, तर नदीचे अस्तित्व जपणे आवश्यक आहे.
नदीचे अस्तित्व जपताना पावसाचे पाणी साठविण्याची, जिरविण्याची गरज घोळसवडे ग्रामपंचायत सदस्य भास्कर कांबळे यांनी स्पष्ट केली. जेणेकरून धरण, नदी व बंधाऱ्यातील जिवंत झरे सातत्याने पाझरतील नि पाण्याची उपलब्धता होईल.
कंपन्यांच्या रॉयल्टीच्या उत्पनातून विकास
कडवी नदीचे धोकादायक चित्र समोर असताना सामाजिक विकासावरील खर्च कोठे होतो ? याचा जाब विचारणारी भूमिका शासनाने घेण्याची गरज आहे. बॉक्साईट उत्खननातील व गॅस कपंनीची कोट्यवधीची रॉयल्टी शासनाकडे जमा होते. त्या रॉयल्टीमधून नदीची स्वच्छता, गाळ काढणी व प्रदूषणमुक्तीची जागृती यावर निधी खर्चास प्राधान्याची गरज आहे.