घरी बसून चमचमीत पदार्थांवर ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST2021-04-25T04:22:38+5:302021-04-25T04:22:38+5:30
कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने पुन्हा एकदा नागरिकांची जीवनशैली बदलली असून सध्या रोज सकाळ-संध्याकाळ चमचमीत पदार्थांवर, बेकरी पदार्थांवर ताव ...

घरी बसून चमचमीत पदार्थांवर ताव
कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने पुन्हा एकदा नागरिकांची जीवनशैली बदलली असून सध्या रोज सकाळ-संध्याकाळ चमचमीत पदार्थांवर, बेकरी पदार्थांवर ताव मारणे, तासनतास टीव्ही बघणे आणि बेडवर मस्त ताणून देणे असा एकूण स्थूल व्यक्तिमत्त्वाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सध्या कडक निर्बंधांमुळे फिरायला जाणे, सायकलिंग करता येत नाही. घरातल्या घरात व्यायाम करायचा म्हणो कंटाळा अशी मानसिकता आहे. मात्र अशा काळातही उत्तम आरोग्य राखणे हीच खरी कसोटी असणार आहे.
गेल्यावर्षी कोरोना सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांचा कडकडीत लॉकडाऊनची संधी करत अनेकांनी कुटुंबासाठी वेळ,, स्वयंपाक घरात पुरुषांनी मुक्त वावर करत आपले नवनवीन प्रयोग केलेले पदार्थ सर्वांना खाऊ घातले, खेळ खेळले. घराघरातील गृहिणी सुखावल्या. हा सगळा महोत्सव गतवर्षी साजरा करुन झाल्यानंतर आता यातला उत्साह कमी झाला आहे.
स्वत: स्वयंपाक करण्याची जागा सोफ्यावर बसून ऑर्डर सोडण्याचे घेतली आहे. सुगरणीने पुन्हा पदर खाेवून चमचमीत पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे. बिस्किटांची जागा खारी, बटरने घेतली आहे. तर युट्यूबद्वारे गुरूने दाखवलेली रेसिपी करून बघण्यासाठी पिझ्झा बेस, पनीर, चीज, केक बनवण्याचे साहित्य, प्रिमिक्स अशा वेगवेगळ्या साहित्यांनी ही फ्रिजचे रकाने भरून गेले आहेत. या काळात सकाळी उशिरा उठणे, गरमागरम आणि लज्जतदार पदार्थांवर ताव मारणे, तासनतास टीव्ही बघणे कंटाळा आला की पुन्हा दुपारी झोप काढणे, जमलंच तर मुलांसाेबत काही गेम खेळणे अशी सध्याची जीवनशैली झाली आहे.
--
सध्या मॉनिंग-इव्हिनिंग वॉक, जलतरण तलाव, जीम सगळेच बंद आहे. अनेक घरांमध्ये घरातल्या घरात फिरण्या इतकी जागाही नसते. कौटुंबिक अडचणी असतात. पण ज्यांना शक्य आहे ते देखील घरात हे सगळं करायला कंटाळा करतात. सभोवतालची परिस्थिती इतकी नकारात्मक आणि कंटाळवाणी असताना मन प्रफुल्लित ठेवणे, स्वत: बरोबर कुटुंबियांचा ही उत्साह वाढवणे हेच मोठे आव्हान झाले आहे.
-
बेकरी पदार्थांवर ताव
बेकरी पदार्थांच्या विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ पर्यंतच परवानगी आहे. पण या काळात जणू दिवसभराच्या खरेदी केली जाते. सध्या सर्वाधिक खरेदी ही मिसळच्या पदार्थांची केली जात आहे. फरसाण आणि ब्रेकला अधिक मागणी आहे.
राजेश मोरे (बेकरी व्यावसायिक)
---
नियमित व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण
प्रतिकारशक्ती चांगली असलेले, व्यायामाला जगण्याचा भाग बनवलेल्या अनेक नागरिकांपर्यंत काेरोना पोहोचू शकला नाही. आणि ज्यांना संसर्ग झाला त्यांना त्या काळात फार त्रास झाला नाही, या काळात घरात बसून आणि अनावश्यक खाण्यामुळे वजन वाढते. त्यामुळे व्यायाम, योगा, प्राणायाम या गोष्टी केल्याच पाहिजेत. नियमित वर्क आऊट करणे, अनावश्यक झोप टाळून पण पुरेशी झोप घेणे, गोड, पॅकेट बंद पदार्थ टाळणे, तब्येत सांभाळणे या गोष्टींवर अधिक लक्ष दिले पाहिजे.
आशिष रवळू (फिटनेस तज्ज्ञ)