लघुउद्योगात महिला बचत गटांची भरारी
By Admin | Updated: January 9, 2017 00:23 IST2017-01-09T00:23:50+5:302017-01-09T00:23:50+5:30
दोन वर्षांत उभारले दोन हजार उद्योग : ९९ टक्के कर्जाची परतफेड; आर्थिक सबलीकरण

लघुउद्योगात महिला बचत गटांची भरारी
इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूर
एक महिला शिकली की फक्त आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर आपल्या बरोबरीच्या महिलांनाही प्रगतीचा मार्ग दाखविते, हे सिद्ध केलंय कोल्हापुरातील महिला बचत गटांनी. ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही म्हण खरी ठरवीत या गटांनी अवघ्या दोन वर्षांत २०१९ नवीन उद्योग उभारले आहेत. दुसरीकडे, या उद्योगांसाठी जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची सरासरी ९९ टक्के इतकी परतफेड केली आहे.
महिला सबलीकरणाच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत २००० सालापासून स्वयंसाहाय्यता महिला बचतगटांची सुरुवात करण्यात आली. किमान दहा महिला अशी अट असलेल्या या गटांद्वारे पहिले सहा महिने अंतर्गत कर्जपुरवठा केला जातो. त्यानंतर त्यांना जिल्हा बँकेकडून ५० हजार रुपये, त्याची परतफेड केल्यानंतर एक लाख आणि त्यानंतर दोन लाख रुपये असा कर्जपुरवठा केला जातो. बँकेचा व्याजदर वर्षाला साडेचौदा टक्के असतो. मात्र गटांतर्गत त्याचे व्याज दोन टक्के इतके असते.
सुरुवातीला गटातील महिला स्वत:च्या कुटुंबाच्या गरजा, मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य अशा कारणांसाठी कर्जाची रक्कम वापरतात. त्यानंतर पुढे वाढत जाणाऱ्या कर्जाच्या रकमेपासून घरगुती पद्धतीने लघुउद्योगांना सुरुवात केली जाते. गटाच्या माध्यमातून एकत्रितरीत्या नवा व्यवसाय करण्याचे प्रमाण अधिक आहे. यात गारमेंट, ब्यूटी पार्लर, दुकान, शॉपीज, भाजी-फळांची विक्री, स्वस्त धान्य दुकान, दूध व दुग्धजन्य पदार्थ, भाडेतत्त्वावर शेती अशा विविध उद्योगांचा समावेश आहे. अशा रीतीने सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात २०१९ नवीन उद्योगांची उभारणी या गटांनी केली आहे.
बँकिंग व्यवहारात अग्रेसर
जिल्हा बँकेच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरअखेर ३६ हजार ९७० महिला बचत गट स्थापन झाले असून, त्यांपैकी २९ हजार ८६९ गटांना ८६९२.१९ लाख इतके कर्जवाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्णातील जवळपास ५ लाख ३७ हजार ७४२ बचत गट महिला सदस्या बँकेचे व्यवहार करीत आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसला आहे.
काही यशोगाथा
बेलवळे येथील भावेश्वरी महिला बचत गटातर्फे खत, बी-बियाणेकेंद्र चालविले जाते. शेळेवाडी येथील जयलक्ष्मी महिला बचत गटाकडून सामुदायिक शेती, दूध संस्था, ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देणे, हे उद्योग केले जातात. शिरोली दुमाला येथील समृद्धी महिला बचतगट, सारथी महिला बचतगट, रोहिणी महिला बचत गट यांनी पुण्यातील मॉलमध्ये भाग घेतला होता.
‘नाबार्ड’अंतर्गत सर्व योजना बचत गटांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील असते.त्यांनी उभारलेल्या उद्योगांमुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत.
- स्नेहल करंडे,
महिला विकास अधिकारी