मुस्लिम, ख्रिश्चनांच्या मनात मोदी सरकारबद्दल भीती
By Admin | Updated: July 10, 2015 23:50 IST2015-07-10T23:36:55+5:302015-07-10T23:50:40+5:30
भाई वैद्य : स्वातंत्र्यसेनानी माधवराव मानेंचा गौरव

मुस्लिम, ख्रिश्चनांच्या मनात मोदी सरकारबद्दल भीती
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकार भांडवलधार्जीणे असल्यामुळे श्रीमंतांची श्रीमंती वाढतच असून गरिबांची संख्या वाढली आहे. दुसऱ्या बाजूला जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून त्यांनी मुस्लिम, ख्रिश्चन समाजाला जगणेही मुश्कील करून ठेवले आहे, असा आरोप स्वातंत्र्यसेनानी व महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री साथी भाई वैद्य यांनी केला. क्रांतिवीर स्वातंत्र्यसेनानी साथी माधवराव माने यांचा सपत्नीक नागरी सत्कार सांगलीतील शांतिनिकेतनमध्ये करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाई वैद्य बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून इंग्रजांविरोधात लढून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर गरीब आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल, त्यांचे द्रारिद्र्य कायमचे संपेल, अशीच स्वातंत्र्यसैनिकांची अपेक्षा होती. पण, सध्या देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ते लक्षात घेता, स्वातंत्र्यसैनिकांची ही अपेक्षा फोल ठरल्याचे दिसत आहे. केंद्र आणि राज्यामध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. त्यांचे निर्णय फक्त श्रीमंतांसाठीच असून यामुळे श्रीमंत श्रीमंतच होत आहेत, गरिबांची संख्या मात्र दिवसाला वाढत चालली आहे. सरकारी आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील ५० टक्के जनतेला जमीनच नाही, तर १८ कोटी भटक्यांची संख्या आहे. रोज या गावातून त्या गावामध्ये भटकंती करणाऱ्यांची वीस कोटीहून अधिक मुले शाळेपासून दूर आहेत. याला स्वातंत्र्य म्हणायचे का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हिंदुत्ववादी संघटना आणि संघ दंगली कशा भडकवता येतील हेच पाहत आहेत. मोदी सरकारच्या धोरणामुळे तर मुस्लिम, ख्रिश्चनांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. हिंदुत्ववादी आणि मोदी सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवून गरिबांपर्यंत खरे स्वातंत्र्य पोहोचविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही भाई वैद्य यांनी तरूणांना केले.
अॅड्. सुभाष पाटील म्हणाले की, इतिहासकारांनी चुकीच्या पध्दतीने खरा इतिहास पुढे येऊच दिला नाही. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना न्याय मिळाला नसून नवीन लेखकांनी न्याय देण्याचे काम करावे, असे त्यांनी आवाहन केले.
अनिल म्हमाणे म्हणाले की, नव्या स्वातंत्र्याची लढाई लढण्याची जबाबदारी आम्हा तरूणांवर असून ती निश्चित पार पाडली जाईल.
यावेळी रघुनाथ (तात्या) केडगे, अखिल भारतीय समाजवादी अध्यापन सभा महासचिव प्राचार्य विशाखाताई खैरे, बापूसाहेब मगदूम, राष्ट्र सेवा दलाचे माजी सहमंत्री साथी हसन देसाई, अॅड्. चिमण लोकूर, नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, शिवाजीराव पवार, एकनाथ जाधव, विद्याताई स्वामी, अनिल माने, अॅड्. आर. एम. जाधव, सुनंदा जाधव आदी उपस्थित होते.
मधुकर पागे यांनी प्रास्ताविक केले, संतोष जाधव यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. सुधाकर कांबळे यांनी मानपत्र वाचन केले. एस. टी. खोत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तरुणांना स्वातंत्र्याचा खरा इतिहास कळेल : पाटील
‘राष्ट्र सेवा दलातील अनमोल हिरे-मोती’ या पुस्तकाचे प्रकाशन अॅड्. सुभाष पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी पाटील यांनी, स्वातंत्र्याचा खरा इतिहास जातीयवादी शक्तीने कधीच मांडला नसल्यामुळे, स्वातंत्र्यसेनानींवर अन्याय झाला आहे. तो माधवराव माने यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून दूर झाल्याचे मत व्यक्त केले.