म्हाकवे : संभाव्य शक्तिपीठ महामार्गात अडथळा निर्माण करणारे विजेचे पोल हटविण्याच्या दृष्टीने महावितरणने सर्व्हे सुरू केला आहे. रविवारी खेबवडे (ता. करवीर) येथून व्हनाळी, केनवडेपर्यंत पोलचा सर्व्हे करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना केनवडे येथे शेतकऱ्यांनी पकडून जाब विचारला.
यावेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन हा सर्व्हे आपण थांबवत असल्याचे सांगत विषयावर पडदा पाडला. यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरत हा सर्व्हे पूर्णतः बंद करा अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
दरम्यान, केनवडे काही शेतकऱ्यांना दोन कर्मचारी मोबाइल मॅपद्वारे सर्व्हे करत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता शक्तिपीठ महामार्गात अडथळा ठरणारे खांब किती आहेत, याची माहिती संकलित करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीकांत चव्हाण (केनवडे) अमोल डाफळे, प्रकाश पाटील, साताप्पा लोंढे, संतोष पोवार, दादासो पाटील (सिद्धनेर्ली), योगेश कुळूवमोडे(व्हनाळी), आनंदा पाटील यासह केनवडे व्हनाळी, खेबवडे, एकोंडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.महावितरणचे अधिकारी धारेवरजिल्ह्यात शक्तिपीठ रद्दच्या अधिसूचना असताना सर्व्हे होतोच कसा? सर्व्हे करण्यास तुम्हाला कोणी सांगितले, असा सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांना दादासो पाटील (सिद्धनेर्ली) यांनी केला. यावेळी सर्वच शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला.दररोज १७ कि.मी. सर्व्हेमहावितरणने दोन कर्मचाऱ्यांना या महामार्गाचा ऑनलाइन नकाशा दिला आहे. तसेच त्यांना दररोज १७ कि. मी. अंतराचा सर्व्हे पूर्ण करून माहिती देण्यास सांगितले असल्याचे या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.