‘कृषी प्लॅन’साठी शेतकऱ्यांचे हेलपाट
By Admin | Updated: November 23, 2014 23:52 IST2014-11-23T23:32:05+5:302014-11-23T23:52:39+5:30
बीएसएनएलकडून अडवणूक : कार्ड नको म्हणण्याची वेळ; असून अडचड नसून खोळंबो

‘कृषी प्लॅन’साठी शेतकऱ्यांचे हेलपाट
कोल्हापूर : कृषी विभाग आणि भारतीय दूरसंचार निगम यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांमध्ये व कृषी अधिकारी, कर्मचारी यांच्यात संवाद वाढावा, यासाठी ‘कृषी प्लॅन’चे सीमकार्ड देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, कार्ड घेण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. विविध कारणांमुळे सेवा केंद्रातून शेतकऱ्यांची सतवणूक केली जात आहे. या साऱ्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता ‘कृषी प्लॅन’ कार्ड नको रे बाबा...’ असे म्हणण्यापर्यंत गेली आहे.
या योजनेचा लाभ पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांनी घेतला. मात्र, आता प्लॅनमध्ये मोबाईल क्रमांक घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. शेतकऱ्याला कसे कार्ड देता येईल, याचा विचार न करता ’क्युरी’ काढून कसे परत पाठविता येईल, याकडे ‘बीएसएनएल’च्या सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कल वाढला आहे.
विशेषत: गडहिंग्लज आणि ताराबाई पार्कमधील ‘बीएसएनएल’ कार्यालयातील सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यास लावले जात आहेत. रहिवाशासाठीच्या पुराव्याचा झेरॉक्सवरील फोटो चांगला आलेला नाही, ओळखत नाही, अशी किरकोळ कारणे सांगून अडवणूक केली जात आहे. झेरॉक्सवरील फोटो स्पष्ट आला आहे की नाही, हे सेवा केेंद्रातील कर्मचारी ठरवत असतो. त्याला वाटलं तर स्पष्ट फोटो नाही तर अस्पष्ट, असे सांगून परत पाठवतो. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावयास लावले जात असल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘बीएसएनएल’ एका बाजूला विविध योजना राबवत आहे, तर दुसरीकडे कार्ड घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची हेटाळणी केली जात आहे.
आपुलकीची वागणूक न देता उद्धटपणाची वागणूक देऊन ‘कृषी प्लॅन’पासून संबंधित शेतकऱ्याला कसे वंचित ठेवता येईल, याकडे लक्ष देत असल्याचा आरोप होत आहे.
संवाद वाढविण्यासाठी !
शेती विभागातील कर्मचारी, अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये संवाद वाढावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी ‘बीएसएनएल’ आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे ‘कृषीप्लॅन’ ही योजना सुरू केली. या प्लॅनमध्ये घेतलेल्या क्रमांकावर मोफत बोलण्यासह काही लाभ मिळतात. यासाठी शेतकरी असणे बंधनकारक आहे.
‘कृषी प्लॅन’ घेण्यास गेल्यानंतर शेतकऱ्याला हेलपाटे मारावे लागत असून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. त्यामुळे ‘बीएसएनएल’ने कारभारात सुधारणा करावी. सेवा केंद्रातील त्रास सुरू राहिल्यास शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जाब विचारला जाईल.
- सुधीर कानडे, शेतकरी,
दुंडगे (ता. गडहिंग्लज)
सेवा केंद्रातील तक्रारींसंबंधी कार्यालयातील वरिष्ठांकडे तक्रार केल्यास कारवाई केली जाईल. ‘ट्राय’च्या सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेतली जातात.
- मंशाराम रावत, महाप्रबंधक, बीएसएनएल.