कासारी नदीकाठचे कृषीपंप बुडाल्याने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:07+5:302021-05-18T04:26:07+5:30
यवलूज वार्ताहर - गेले दोन दिवस चक्रीवादळाने झालेल्या धुवाधार पावसाने पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याला अक्षरश: झोडपून काढल्याने कासारी पाणलोट ...
यवलूज वार्ताहर - गेले दोन दिवस चक्रीवादळाने झालेल्या धुवाधार पावसाने पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याला अक्षरश: झोडपून काढल्याने कासारी पाणलोट क्षेत्रातील कासारी नदीच्या पाणी पातळीत अचानक झपाट्याने वाढ झाली. परिणामी नदीकाठावरील शेतीच्या पाण्यासाठी बसवण्यात आलेले शेतकऱ्यांचे कृषी वीज पंप पाण्यात बुडाले असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हजारो रुपयांचा फटका यानिमित्ताने त्यांना बसला आहे. कोरोनाच्या महामारीत मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना या नैसर्गिक अस्मानी संकटापुढे नव्याने पुन्हा एकदा हतबल होण्याची वेळ आली आहे.
शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कासारी नदीकाठी यवलूज, पडळ, माजगाव, खोतवाडी, देवठाणे आदी गावच्या शेतकऱ्यांनी कृषी वीज पंप बसविले आहेत. नदीतील पाण्याच्या साठवणीसाठी जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. दोन दिवस या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली. अचानक वाढलेल्या या नदीतील पाणीपातळीमुळे अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंप आहे त्या स्थितीत पाण्यात बुडाल्याने कृषी वीज पंप दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना आता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
फोटो ओळ:- अवकाळी पावसामुळे कासारी नदीकाठचे कृषी पंप पाण्यात बुडाले आहेत.