कोल्हापूर : रिपब्लिकन पक्षाने आतापर्यंत ज्यांना साथ दिली ते पक्ष सत्तेवर आले आहेत. आमचा पक्ष छोटा पक्ष असला तरी निडवणुकांमध्ये पाडायचे कुणाला आणि जिंकवायचे कुणाला हे आमच्या हातात आहे, तेवढी ताकद आमच्याकडे आहे, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. महायुतीत मी समाधानी परंतु कार्यकर्ते असमाधानी असल्याची टिप्पणी त्यांनी केली.मंत्री आठवले म्हणाले, राज्यात लवकरच महामंडळांचे वाटप होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आरपीआय कार्यकर्त्यांची यादी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध महामंडळे, जिल्हा नियोजन समितीमध्ये २५ टक्के वाटा आरपीआयला द्यावा. आम्ही भाजपच्या कोट्यातून असल्याने आम्हाला भाजपने या जागा द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.अन्याय अत्याचारांचा मुकाबला करणाऱ्या दलित पँथर या आक्रमक संघटनेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार करत आहोत. आजची तरुण पिढी केवळ व्हॉट्सॲप, फेसबुकवर आपला राग व्यक्त करते. या नव्या पिढीला पुन्हा सामाजिक क्रांतीच्या आंदोलनात उभे करण्यासाठी नव्या पिढीच्या हाती दलित पँथरचे संघटन देण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.विधानसभेच्या १२ जागा द्याभाजपसोबत गेल्यानेच आरपीआय पक्ष देशभर वाढला. नागालँडमध्ये दोन आमदार आहेत. इतरही राज्यातही पक्षाचे आमदार आहेत. भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या १२ जागा दिल्यास राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून आरपीआयची नोंदणी होईल, असेही आठवले म्हणाले.
लहान असलो तरी पाडायचे आणि जिंकवायचे कुणाला, आमच्याच हातात; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:18 IST