वारणा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे शेतीचा पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST2021-05-07T04:26:17+5:302021-05-07T04:26:17+5:30
गेले दोन- तीन दिवस वारणा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खाली गेल्याने नदीवरील विद्युत मोटर पंप उघडे पडले आहेत. ...

वारणा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे शेतीचा पाणीपुरवठा ठप्प
गेले दोन- तीन दिवस वारणा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खाली गेल्याने नदीवरील विद्युत मोटर पंप उघडे पडले आहेत.
मार्च अखेरीस व मेच्या पहिल्या आठवड्यात असे दुसऱ्यांदा ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असताना वारणा नदीतील पाणीपातळी खालावून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंप उघडे पडले असल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. साहजिकच शेतीस पाणी पुरवठा लांबल्याने जवळपास पंधरा दिवस पाण्याचा फेर लांबणार आहेत. याचा फटका माळभागच्या व मोठ्या पाणीपुरवठा योजनेखालील असणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी भीती व्यक्त करीत असून, धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त असूनसुद्धा पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत कोडोली येथील वारणा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता धरणक्षेत्राजवळील पाॅवरहाऊसमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी पाणी सोडणे थांबविण्यात आले होते. एक-दोन दिवसांत पाणीपातळी पूर्ववत होईल असे सहायक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी सांगितले.
धरण क्षेत्रात पाणी साठा असतानाही केवळ पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारणा नदी काठावरील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने याविरोधात वरिष्ठांच्या दाद मागण्याचा इशारा जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील (किणीकर) यांनी दिला आहे.
..... फोटो ओळी. ऐन उन्हाळ्यात वारणा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे विद्युत मोटार पंप उघडे पडले आहेत.