नागणवाडी, आंबेओहोळ, उंचगी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:30 IST2021-08-14T04:30:07+5:302021-08-14T04:30:07+5:30
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत ...

नागणवाडी, आंबेओहोळ, उंचगी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात चर्चा
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आंबेओहळ, उचंगी, नागणवाडी येथील प्रकल्पग्रस्त यांच्यात मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यामध्ये स्वेच्छा पुनर्वसन घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाढीव सानुग्रह अनुदान देण्याचे एकमताने मंजूर करण्यात आले. पुनर्वसनातील देय जमिनीची मर्यादा १.६१ हेक्टर ऐवजी २.८० हेक्टरपर्यंत देण्याची धरणग्रस्तांची मागणी मान्य करण्यात आली. प्रकल्पग्रस्त दाखलेधारकांना सरकारी, निमसरकारी, सहकारी आस्थापनेत ५ टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्यात येतील. तसा शासन आदेश काढण्याचे आश्वासन देण्यात आले. संकलन रजिस्टरमध्ये नात, सुना यांचा समावेश करण्याबाबत योग्य विचारविनिमय करण्याचे ठरले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपअभियंता दिनेश खट्टे, प्रकल्पग्रस्त संजय येजरे, सतीश आपके, शंकर पावले आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यातील नागणवाडी, आंबेओहोळ, उचंगी प्रकल्पाच्या पुनर्वसनाबाबत मार्गदर्शन करताना पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील अधिकारी व धरणग्रस्त.
क्रमांक : १३०८२०२१-गड-१२