दूध उत्पादकांच्या रेट्यामुळेच मल्टिस्टेटचा निर्णय मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:23 IST2021-04-17T04:23:57+5:302021-04-17T04:23:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटचा विषय कोणी आणला, त्याला कोणी विरोध केला, हे जिल्ह्यातील सुज्ञ सभासदांना माहीत ...

दूध उत्पादकांच्या रेट्यामुळेच मल्टिस्टेटचा निर्णय मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटचा विषय कोणी आणला, त्याला कोणी विरोध केला, हे जिल्ह्यातील सुज्ञ सभासदांना माहीत आहे. दूध उत्पादकांच्या पाठबळावर पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मल्टिस्टेटविरोधात लढा उभारला. उत्पादकांच्या रेट्यांमुळेच मल्टिस्टेटचा निर्णय सत्तारूढ गटाला मागे घ्यावा लागल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत व ‘बिद्री’चे संचालक श्रीपती पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
‘मल्टिस्टेट’चा मुद्दा संपला असून, विरोधक जुन्या कढीला ऊत आणत असल्याची टीका संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी केली होती. यावर, ‘गोकुळ’च्या कारभाराबाबत दूध उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अशा परिस्थितीत निवडणूक लढवली तर सभासद नाकारणार, याची जाणीव सत्तारूढ गटाच्या नेत्यांना झाली होती. त्यासाठीच ‘गोकुळ’ मल्टिस्टेटचा डाव रचला, वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी सत्तारूढ गटाने जंग जंग पछाडले. सभेत कितीही विरोध झाला तरी ठराव मंजूर करण्याचे आदेश सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी दिले होते. त्यानुसार सभा तीन मिनिटांत गुंडाळली, मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी सभासद सभेच्या ठिकाणी येताच, विरोधक आलेत; लवकर मल्टिस्टेटचा विषय मांडा, असे महादेवराव महाडिक का ओरडत होते; तो ठराव कसा मंजूर केला, हे सगळे सभासदांना माहीत आहे. हे सगळे अध्यक्ष रवींद्र आपटे बघत होते आणि आता हा विषय जुना झाल्याचे सांगून पांघरूण टाकत असल्याचे खोत व पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.