बदनामी करणाऱ्यांवर वचक बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:05+5:302016-03-16T08:36:06+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाची रंगरंगोटी, डागडुजी, नूतनीकरण स्वखर्चाने केल्याचा कांगावा केला.

बदनामी करणाऱ्यांवर वचक बसवा
चित्रपटसृष्टीशी दुरान्वयानेही संबंध नसणारी, त्यांचे बगलबच्चे असणारी भाडोत्री माणसे आणून सर्वसाधारण सभेचे सभागृह खचाखच भरवले आणि त्यामध्ये आपल्या भूत-वर्तमान व भविष्यातील संभाव्य पापकर्मांचा पाढाच वाचला.
कुणाशीही चर्चा न करता अधिकाराचा गैरवापर करून महामंडळाचे नावच बदलण्याचा घाट घातला. मात्र, ऐनवेळी महामंडळाचे माजी अध्यक्ष रामदास फुटाणे, भास्कर जाधव आणि यशवंत भालकर यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यावेळी उपस्थित असलेले तत्कालीन सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांनी अध्यक्षांना समजावून सांगितले, पण त्यांनी कुणालाही न जुमानता अनावरण केले. त्यामुळे काळ््याकुट्ट इतिहासाची जखम चिघळली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाची रंगरंगोटी, डागडुजी, नूतनीकरण स्वखर्चाने केल्याचा कांगावा केला. अहवालात या बाबींवर खर्च दाखविला. त्याचे गूढ अजूनही उकलले नाही. त्यानंतरच्या संयुक्त सर्वसाधारण सभेपूर्वी जेवणावळीचा खर्च महामंडळावर का? सर्वसाधारण सभेत भाडोत्री माणसे आणून राजकीय आखाडा निर्माण केला. सभेच्या सुरुवातीलाच त्या ‘अध्यक्ष, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’ या घोषणा सुरू होताच सभागृहाने त्याला हरकत घेतली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहातच जाहीर दिलगिरी व्यक्त करून घोषणा देणाऱ्यांना सभागृहाबाहेर हाकलले.
महामंडळांच्या नामकरणाचा विषय सभासदांवर लादण्याचा प्रयत्न करताच सभेने त्यास कडाडून विरोध करून नामकरण हाणून पाडले. जमा-खर्च आणि सभासदांच्या कोणत्याही प्रश्नावर अध्यक्ष समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. मनमानी करून सभा आटोपती घेण्याचा प्रयत्न अध्यक्ष करू लागताच, सभासद रणजित तथा बाळा जाधव यांनी पत्रांच्या उत्तरासाठी आग्रह धरताच उपाध्यक्षांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे पर्यवसान माईक आपटून फोडण्यापर्यंत झाले. याला संपूर्ण कार्यकारिणीच जबाबदार नाही का? घटना दुरुस्ती मंजूर झाल्याचे सभेच्या एकूण गोंधळातच जाहीर करण्याचा प्रयत्न करून ही सभा जवळजवळ गुंडाळण्यातच त्यांनी धन्यता मानली.
अखिल भारतीय चित्रपट महांमडळाची दुसरी सर्वसाधारण सभा बेकायदेशीरपणे बोलाविण्यात आलेली असल्यामुळे सभासदांनी सभाच रद्द करण्यास भाग पाडले. चित्रपट महामंडळाचा अनागोंदी कारभार, तत्कालीन अध्यक्षांची हुकूमशाही, भ्रष्टाचार या दुष्टचक्रातून महामंडळ वाचविण्यासाठी सभासद, निर्माते मेघराज राजेभोसले, सुरेंद्र पन्हाळकर आणि मी (अर्जुन नलवडे ) धर्मादाय आयुक्त यांच्याकडे विद्यमान संचालकांच्या चौकशीसाठी तक्रार अर्ज दावा दाखल केला. त्याबाबत त्यांनी विद्यमान संचालकांचे म्हणणे मागविले. देवाच्या खोट्या शपथेवर प्रतिज्ञा करणारे प्रमुख कार्यवाह व इतरांनी तत्कालीन अध्यक्ष व सहखजानिस यांनी महामंडळाची रक्कम स्वत:साठी वापरून संस्थेचे नुकसान केले. याबाबतची फिर्याद कोल्हापूर येथील न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात रे. क्रि. के. नं. ८२/२०१४ आणि दै. नं. १८९/१४ अन्वये दि. २१/०१/२०१४ रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत (अंतर्गत), इं. पि. को. क्र. ४०६, ४०८, ४२०, ४६६, ४७७/ए सह ३३४ प्रमाणे फौजदारी स्वरूपात दाखल केली आहे. तसेच सदर रक्कम वसुलीसाठी कोल्हापूर येथील मा. न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयात दै. र. नं. २०५/२०/०१/१४ अन्वये दावा दाखल केला असून, तसे न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. प्रत्यक्ष दोन्ही न्यायालयात एकाच विषयावर विसंगत प्रतिज्ञापत्र सादर करणे गंभीर आहे. संबंधित संचालकांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणे महामंडळाच्या भविष्यकालीन इतिहासाच्या दृष्टीने अत्यावश्यक नाही का?
प्रमुख कार्यवाह व इतर काही संचालकांनी या कार्यालयात म्हणणे मांडताना संस्थेमध्ये कोणतेही गैरव्यवहार झालेले नाहीत, अनावश्यक कार्यासाठी खर्च करून आर्थिक नुकसान झालेले नाही, नियमावलीविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये झालेली नाहीत, असे म्हणणे मांडून सदर न्यायालयात, संस्थेचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही... असे म्हणणे, देवाच्या शपथेवर मांडून प्रमुख कार्यवाह यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे.