कोल्हापूर : दुबईच्या मैदानात आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा २५ वर्षांचा हिशोब चुकता करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी रात्री क्रिकेटच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली आहे. १२ वर्षांनंतर भारतीय संघानं वन डे आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारताने मिळवलेल्या या विजयानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुण क्रिकेटप्रेमी लगेच जमले. त्यांनी तेथेच एकच जल्लोष केला. विजय मिळताच अनेक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे आले.
तिरंगा आणि भगव्या झेंड्यांसह गर्दी वाढू लागली. स्पीकरवर विजयी गीत वाजवत अनेकजण चौकात थिरकू लागले. सुमारे तासभर या ठिकाणी एकच जल्लोष आणि आतषबाजी झाली. जल्लोषानंतर पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला.
इचलकरंजीत मोठा जल्लोष, रंगपंचमीपूर्वीच रंगांची उधळण इचलकरंजी : चॅम्पियन ट्रॉफीवर भारताने आपले नाव कोरल्यानंतर क्रिकेटप्रेमी तरुणाई येथील मलाबादे चौकात येऊन विजयाचा जल्लोष व फटाक्याची आतषबाजी केली. संपूर्ण परिसर गुलाल आणि पिवडीने न्हाहून निघाला होता.भारताने विजय मिळविल्यानंतर मोटारसायकलीने मलाबादे चौकामध्ये तरुणाई एकत्र जमू लागली, रोहित शर्मा, विराट कोहली यांची छायाचित्रे, तिरंगा आणि भगवा झेंडा घेऊन तरुणाईने पाहता पाहता मलाबादे चौक, गांधी कॅम्प, जुनी नगरपालिका, गांधी पुतळा परिसर व्यापला आणि जल्लोष केला. पाहता पाहता सुमारे दहा हजारांहून अधिक लोक या रस्त्यावर जमले. रंगपंचमीपूर्वीच तरुणाईने रंगांची उधळण केली.