राजाराम बंधारा पर्यायी पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST2021-03-04T04:45:02+5:302021-03-04T04:45:02+5:30
वडणगे :- कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन पर्यायी पुलाचे काम गेली दोन ते तीन वर्षे सुरू ...

राजाराम बंधारा पर्यायी पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा
वडणगे :- कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन पर्यायी पुलाचे काम गेली दोन ते तीन वर्षे सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, हे काम लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा वडणगे कृती समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय माने यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी माने यांनी या पर्यायी पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून पूल वाहतुकीस खुला करण्याची ग्वाही दिली.
या निवेदनात म्हटले आहे, सदरचा मार्ग हा वीस ते पंचवीस गावांना जोडणारा आहे. हा पूल पूर्ण झाल्यास शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे. नोकरी - व्यवसायांकरिता या मार्गावरून हजारो लोक दररोज ये-जा करतात. पुराच्या काळात राजाराम बंधाऱ्यावरील रस्ता बंद होऊन अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे पर्यायी पुलाचे काम लवकर होणे गरजेचे आहे. सध्या ठेकेदाराकडून या पुलाच्या कामास दिरंगाई होत असून, त्याच्यावर कारवाई करा अन्यथा वडणगे कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय आंदोलन छेडू, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी कृती समितीचे रवींद्र पाटील, सुनील परीट, दिलीप प्रभावळे, दादासाहेब शेलार, राजेंद्र पोवार, ओंकार पाटील उपस्थित होते.