शाहूंच्या कार्याचा वसा जपणारे स्मारक --लोकमतसंगे
By Admin | Updated: January 11, 2016 01:08 IST2016-01-11T00:57:22+5:302016-01-11T01:08:41+5:30
जाणून घेऊराजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट : सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल; कोल्हापूरच्या सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे केंद्र

शाहूंच्या कार्याचा वसा जपणारे स्मारक --लोकमतसंगे
संतोष मिठारी -- कोल्हापूर -राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यास पूरक समाजप्रबोधन करण्यासह कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, संगीत, चित्रपट आदी क्षेत्रांतील उपक्रम राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट राबवत आहे. स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या ट्रस्टचे राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन हे करवीरनगरीचे महत्त्वाचे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे. ट्रस्ट उभारणी, राबविले जाणारे विविध उपक्रम, भवनचे बांधकाम आणि त्याच्या विकासाचे टप्पे ‘लोकमत संगे जाणून घेऊ’. महाराष्ट्रात दि. ३० जून १९७४ रोजी राजर्षी शाहू जन्मशताब्दी उत्साहाने साजरी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत जन्मशताब्दी महोत्सव झाला. राज्य शासनातर्फे या महोत्सवाची सांगता कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर दि. २३ फेब्रुवारी १९७६ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. अध्यक्षस्थानी तत्कालीन शिक्षणमंत्री शंकरराव चव्हाण होते. या कार्यक्रमात राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट, गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू छत्रपतींचे चिरंतन स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला. त्यातून शासन आणि समाजाच्या संयुक्त सहभागातून राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची दि. २ आॅगस्ट १९७६ रोजी स्थापना झाली. ट्रस्टने राजर्षी शाहूंच्या जीवन व कार्यास पूरक समाजप्रबोधन करण्यासह कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, संगीत, चित्रपट आदी उपक्रम करण्यासाठी ‘राजर्षी शाहू छत्रपती स्मारक’ भवन उभारण्याचे ठरवले. यासाठी राज्य शासनाने दसरा चौक येथे २८ हजार ५०० चौरस फूट जागा नाममात्र एक रुपया भुईभाड्याने दिली. भवनच्या उभारणीसाठी २१ लाख रुपये खर्च झाले. या भवनचा भूमिपूजन समारंभ दि. १५ आॅगस्ट १९७७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डी. टी. जोसेफ यांच्या हस्ते, तर उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या हस्ते दि. ३ फेब्रुवारी १९८१ रोजी झाले. अध्यक्षस्थानी श्रीमंत पु. मा. छत्रपती विजयमाला महाराणीसाहेब होत्या. वास्तुशिल्पी आर. एस. बेरी यांनी तयार केलेल्या संकल्पित आराखड्यानुसार साकारलेल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनात विविध सुविधा उपलब्ध झाल्या. प्रतीक्षालय, सभागृह, रंगमंच, प्रदर्शन कक्ष, अतिथीगृह, गं्रथालय, कार्यालय, चर्चा दालन आदींचा समावेश असलेले एक सांस्कृतिक केंद्र बनले. तत्कालीन जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर यांच्या कार्यकालात सुरू झालेले भवनचे काम तत्कालीन जिल्हाधिकारी आर. एम. प्रेमकुमार यांच्या कार्यकालात पूर्ण झाले. यासाठी कोल्हापूरचे नागरिक, उद्योगपती, सहकारी संस्था, साखर कारखाने, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, कामगार, मजूर, शेतकरी आदींनी मदतीचा हात दिला. त्यातून ३१ लाख रुपयाच्या जमा निधीतून २१ लाखांचा इमारतखर्च वजा जाता उर्वरित निधी भविष्यकालीन उपक्रम आणि कार्यासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर तीस वर्षांतील सातत्यपूर्ण कार्यामुळे जनतेच्या या ट्रस्टकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या. २१ व्या शतकातील माहिती-तंत्रज्ञानातील क्रांती, जीवनशैलीतील बदल, जागतिकीकरणाची आव्हाने, उद्योग-व्यापार व्यवहारांच्या नव्या गरजा लक्षात घेता शाहू स्मारक भवन अपुरे पडू लागले. बैठक क्षमता वाढ, विविध दालनांची निर्मिती, सुविधा, विकास लक्षात घेऊन ट्रस्टने सुमारे दोन कोटी रुपये खर्चून विद्यमान भवन तीन मजल्याने विस्तारून ते लोकसेवेस अर्पण केले आहेत. सन १९७७ ते ८० दरम्यान उभारलेल्या या भवनात सन १९९७ सुमारे ५० लाख रुपये खर्चून दुरूस्ती, रंगरंगोटी केली तरी, सेवेवरील ताण कमी होत नव्हता. त्यानंतरचा विस्तारीकरणाचा हा प्रकल्प वास्तुशिल्पी मोहन वायचळ यांची रचना असून त्यांच्याच देखरेखीखाली तो पूर्ण झाला.
त्यानंतर बदलत्या परिस्थितीचा वेध घेऊन अद्यावत सुविधांसाठी भवनचे सन २०१०-११ मध्ये नूतनीकरण आणि विस्तारीकरण केले. त्यात अभिवादन स्थळ, प्रशस्त प्रांगण, कलादालन, प्रदर्शन कक्ष, सभागृह, सुसंवाद कक्ष,
बहुउद्देशीय सभागृह, अतिथीगृह, हायटेक कल्चरल सेंटर विकसित केले आहे. भवनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस राजर्षी शाहू छत्रपतींचे
जीवन व कार्य एका दृष्टिक्षेपात समजावे यासाठी शिल्पकार अशोक सुतार यांच्या हस्ते स्मृतिशिल्प उभारले आहे. भवनच्या इमारतीच्या विस्तारीकरण, नूतनीकरणासह वर्षागणिक ट्रस्टच्या उपक्रमात वाढ होत गेली. सामाजिक विचाराचे एक पुरोगामी व्यासपीठ म्हणून हे ट्रस्ट व भवन राज्यात प्रसिद्ध आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश विचारवंतांनी या व्यासपीठावर आपली हजेरी लावली आहे. ट्रस्ट
आणि भवन हे कोल्हापुरातील अग्रेसर सामाजिक, सांस्कृतिक केंद्र बनले आहे.
बाबूराव धारवाडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान
शाहू जन्मशताब्दीतून पुढे आलेली राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट आणि भवनची संकल्पना माजी आमदार बाबूराव धारवाडे यांनी अॅड. पी. बी. साळुंखे आणि इतर शाहूभक्तांच्या सहकार्याने साकारली. धारवाडे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अगदी स्वत:च्या घराच्या भिंतीवरील गिलाव्यावर जसे पाणी मारतात तसेच पाणी शाहू स्मारक भवनच्या भिंतीवर त्यांनी मारले आहे. ट्रस्ट आणि भवनच्या माध्यमातून त्यांनी शाहूकार्याचे स्मारक उभारले. या स्मारकाच्या मूळ कल्पनेचे जनक अॅड. साळुंखे आणि धारवाडे हे या ट्रस्टवर नव्हते. त्यांची शाहूभक्ती आणि ट्रस्टच्या उभारणीसाठी घेतलेले कष्ट पाहून त्यांना ट्रस्टवर ‘विश्वस्त’ म्हणून घेण्याची शिफारस तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी केली होती.
राजर्षी शाहू पुरस्काराने दिग्गज व्यक्ती, संस्थांचा सन्मान
समाजप्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, संगीत या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तीस अथवा संस्थेस ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. पुरस्काराची सुरुवात सन १९८४ मध्ये झाली. यामध्ये भाई माधवराव बागल, मेहरूनिस्सा दलवाई, डॉ. व्ही. शांताराम, शाहीर पिराजीराव सरनाईक, डॉ. बाबा आढाव, तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नानासाहेब गोरे, बाबा नेसरीकर, चंद्रकांत मांडरे, कुसुमाग्रज, डॉ. शंकरराव खरात, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, रयत शिक्षण संस्था, जयंत नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, जयमाला शिलेदार, यशवंतराव मोहिते, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ. आ. ह. साळुंखे, कॉ. गोविंद पानसरे, बाबूराव धारवाडे व रा. कृ. कणबरकर, प्राचार्य पी. बी. पाटील, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.
ट्रस्टचे विविध क्षेत्रांत कार्य
ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करून पुरोगामी विचारांचा प्रचार, प्रसार व लोकप्रबोधन केले जाते. शाहू महोत्सव, शाहू संगीत रजनीचे आयोजन, राजर्षी शाहू पुरस्कारांद्वारे समाजसुधारक आणि संस्थांचा गौरव करण्यात येतो. राजर्षी शाहू राज्यारोहण शताब्दी सोहळा, जिल्हास्तरीय वक्तृत्व, चित्रकला, एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले आहे. जिल्हास्तरीय साहित्य संमेलन, राजर्षी शाहू छत्रपती स्मृतिचित्र प्रकाशन करण्यात आले. हृदयशस्त्रक्रिया व कॅन्सर उपचारासाठी गरजू रुग्णांना अर्थसहाय्य केले जाते. ग्रंथालयाचे संचालन व वाचनसंस्कृती विकासाला बळ देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध प्रदर्शनांतून साहित्य, कला, संगीत विकासाला हातभार. मेळावे, चर्चासत्र, परिषदांच्या आयोजनातून समाजप्रबोधनासाठी चित्रपट महोत्सव, स्लाईड शो, चित्रपट संस्थांना प्रोत्साहन दिले आहे.
राजर्षी शाहूंचे वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा वारसा जतन आणि संवर्धन करण्याचे काम ट्रस्टतर्फे केले जाते. यापुढे ट्रस्ट आणि समाजातील सर्व संबंधित घटकांना घेऊन ट्रस्टचे कार्य जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक व्यापक स्वरूपात करण्याचा प्रयत्न राहील.
- विवेक आगवणे
सचिव, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट