उत्तुरात विद्यार्थी देणार ग्रामस्थांना स्वच्छतेचे धडे
By Admin | Updated: December 19, 2014 23:35 IST2014-12-19T21:08:29+5:302014-12-19T23:35:36+5:30
१५०० विद्यार्थ्यांचा सहभाग : ग्रामपंचायत करणार विद्यार्थ्यांना मदत; प्रभागनिहाय स्वच्छतेचा मंत्र

उत्तुरात विद्यार्थी देणार ग्रामस्थांना स्वच्छतेचे धडे
रवींद्र येसादे - उत्तूर -माझं गाव स्वच्छ अन् सुंदर दिसण्यासाठी उत्तुरातील सर्व शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १५०० विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रॅली काढून प्रबोधन करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्तूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालय, अरविंद विद्यामंदिर, पार्वती शंकर विद्यालय, कुमार व कन्या विद्यामंदिर, नवजीवन विद्यालय व वसंतरावदादा पाटील येथे शिक्षकांची बैठक घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय झाला. सध्या ‘स्वच्छ भारत-सुंदर भारत’ या संकल्पनेनुसार गाव स्वच्छ असावे, ही संकल्पना विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसमोर मांडण्यात येऊन कचरा उठावाचे सातत्य ग्रामस्थांनी राखावे. स्वच्छता मोहिमेबाबत सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच संजय उत्तूरकर, ग्रामसेवक राजेंद्र नुल्ले, सदस्य महेश करंबळी यांची बैठक होऊन कचरा उठावाबाबत चर्चा झाली.
ग्रामस्थांनी सातत्य राखावे
दोन टप्प्यात गाव स्वच्छ ठेवण्याचे शाळांनी ठरवले आहे. कचरा उठाव केल्यानंतर पुन्हा कचरा होऊ नये म्हणून पालक, ग्रामस्थ, व्यापारी, हॉटेल मालक यांनी काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वच्छतेमध्ये ग्रामस्थांनी सातत्य राखावे, अशी मागणीही शाळांनी केली.
बांधकाम परवानाबाबत ग्रा.पं.ने काळजी घ्यावी
घराच्या पाठीमागे असणारी परडी रिकामी न ठेवता बांधकामे होत आहेत. पूर्वी कचरा परड्यात कुजून तो शेताकडे खत म्हणून वापरला जायचा. ते आता बंद होऊन कचरा रस्त्यावर येऊन उकिरडे तयार होत आहेत. याकडेही ग्रा.पं.ने लक्ष द्यावे.
केवळ कर्मचारी म्हणूनच सोसतात...
कचरा उठावासाठी असणारे ग्रा.पं.चे कर्मचारी हतबल झाले आहेत. ओल्या, सुक्या कचऱ्याबरोबर चुलीतील राख, जुनी कपडे, प्लास्टिक, शेळ्या-मेंढ्यानी खाल्लेली ओली लाकडे आदी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. केवळ कर्मचारी म्हणूनच हा प्रकार सोसत आहेत. ग्रामस्थांनी किमान कचरा टाकताना विचार करावा.
शाळांच्या निर्णयाचे स्वागत
स्वच्छता करण्याच्या निर्णयाचे ग्रा.पं.ने सर्व शाळांचे स्वागत केले. स्वच्छतेत सातत्य टिकवण्यासाठी ग्रा.पं.चे सहकार्य असून, स्पर्धा राबवण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारी अथवा १५ आॅगस्टला विद्यार्थ्यांना यथोचितपणे गौरविले जाईल, असे ग्रामपंचायतीने सांगितले.