‘चित्री’चे पाणी ४२ टक्क्यांवर

By Admin | Updated: March 25, 2016 23:35 IST2016-03-25T21:36:41+5:302016-03-25T23:35:53+5:30

झपाट्याने पाणीपातळीत घट : मे महिन्यापासून पाणीप्रश्न गंभीर बनणार

'Chitri' water is 42 percent | ‘चित्री’चे पाणी ४२ टक्क्यांवर

‘चित्री’चे पाणी ४२ टक्क्यांवर

आजरा : आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील पाण्याचा प्रमुख स्रोत असणाऱ्या चित्री प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, सद्य:स्थितीला पाणीसाठा केवळ ४२ टक्क्यांवर आल्याने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपासून पाणीप्रश्न गंभीर बनणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुळातच यावर्षी चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. सांडव्यावरून पाणी न वाहण्याचे पहिल्यांदाच घडले आहे. सद्य:स्थितीला तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे. ‘चित्री’चे पात्र प्रथमच उघडे पडू लागले आहे.
पाणीपातळी घटण्याचा वेग पाहून पाटबंधारे विभागाने मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत शेतीकरिता पाणी सोडण्याचे, तर त्यानंतर केवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
चित्रीतील घटलेल्या पाणीसाठ्याचा परिणाम गडहिंग्लज तालुक्यातील शेती पिकांवरही होणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेतले जाण्याची शक्यता आहे. आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील इतर यरंडोल तलाव, खानापूर, धनगरवाडी येथेही फारशी वेगळी अवस्था नसली, तरी दोनचार जोरदार वळीव पाऊस झाल्यास त्या भागातील पाणीप्रश्न संपुष्टात येऊ शकतो, असे असले तरी या गोष्टी जर-तर वर अवलंबून असल्याने यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: 'Chitri' water is 42 percent