‘गडहिंग्लज’साठी पडेल ती किंमत मोजणार
By Admin | Updated: March 19, 2016 00:27 IST2016-03-19T00:27:13+5:302016-03-19T00:27:27+5:30
हसन मुश्रीफ : गडहिंग्लज कारखाना निवडणुकीसाठी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारास प्रारंंभ

‘गडहिंग्लज’साठी पडेल ती किंमत मोजणार
गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिली.
माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील श्री सोमलिंग मंदिरात शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. वेळेवर व चांगला ऊस मिळण्यासाठी दर्जेदार बियाणे आणि ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करा, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.
मुश्रीफ म्हणाले, कारखान्याला ऊर्जितावस्था येण्यासाठी गाळप क्षमता वाढवून विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. संचालक मंडळाची तयारी असेल तर विस्तारीकरणाचा खर्च कंपनी करेल किंवा कंपनीचे पैसे भागविण्याची कारखान्याची तयारी असेल तर कंपनी परत जाईल.
शिंदे म्हणाले, प्रत्येक सभासदाला कारखान्याची निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिंदे नको म्हणणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीचा सभासदच समाचार घेतील.
उदय जोशी म्हणाले, एका बाजूला तालुक्याच्या विकासासाठी ४० वर्षे झटलेली माणसं आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीपुरती येणारी मंडळी यापैकी योग्य पर्याय सभासद नक्कीच निवडतील.
संग्रामसिंह नलवडे म्हणाले, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळाबाबत चिंतन करून भविष्यासाठी ठोस काम करण्याची गरज आहे. कारखाना वाचविण्यासाठी शेतकरी आघाडी हाच एकमेव पर्याय आहे. बी. एन. पाटील यांचेही भाषण झाले.
यावेळी सभापती मीना पाटील, नगराध्यक्ष राजेश बोरगावे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, युवराज पाटील, भैया माने, संतोष पाटील, रामाप्पा करिगार, बाळेश नाईक, बी. टी. पाटील, प्रा. स्वाती कोरी, शिवप्रसाद तेली, आदींसह राष्ट्रवादी व जनता दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.
महाबळेश्वर चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ घेज्जी यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पाटील यांनी उमेदवारांचा परिचय करून दिला. मनोज बोरगल्ली यांनी आभार मानले. यावेळी सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गैरव्यवस्थापनामुळे तोटा नव्हे!
गडहिंग्लज कारखान्यातील तोटा गैरव्यवस्थापनामुळे नव्हे तर गाळप क्षमता वाढ, विस्तारीकरणाअभावी झाल्याचे ब्रीस्क् कंपनीच्या तीन वर्षांच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे. तीन वर्षांत कंपनीलाही १९ कोटींचा तोटा झाला असून, सुमारे ४० कोटींची कर्जे भागविली आहेत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.